Pune News : 11 वर्षांचा मुलगा बाबांसोबत दुचाकीवरुन ट्यूशनला चाललेला, पण रस्त्यात एक खड्डा आला अन्..सगळी स्वप्न क्षणात उद्ध्वस्त
राज्यातील सर्वच भागांमध्ये ही खड्ड्यांची समस्या आहे. नागरिक या खड्ड्यांमुळै हैराण झाले आहेत. काही शाळकरी विद्यार्थ्यांनी गंमतीशीर व्हिडिओ बनवून खड्ड्यांच्या या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधलं.

रणजीत जाधव, प्रतिनिधी : राज्यात सध्या रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. अनेक निष्पाप नागरिकांना या खड्ड्यांमुळे आपले प्राण गमवावे लागत आहेत. अनेक लोक जखमी होत आहेत. दररोज या घटना घडत आहेत. आता पुण्यात हिंजवडी येथे खड्ड्यांमुळे एका 11 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हिंजवडी महाळुंगेत खराब रस्त्यांमुळे एका 11 वर्षीय मुलाला आपले प्राण गमवावे लागले. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
महाळुंगे येथील ग्रीन कोट सोसायटीसमोरील दुर्गा कॅफेजवळ हा भीषण अपघात झाला. वडील, मुलगा आणि मुलगी दुचाकीवरून ट्यूशनला जात होते. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकी घसरल्याची प्राथमिक माहिती आहे. दुचाकी घसरल्यानंतर 11 वर्षीय मुलगा मागून येणाऱ्या आयशर ट्रकखाली आला. ट्रकखाली आल्याने चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला.
नागरिकांची मोठी गर्दी झालेली
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. महाळुंगे परिसरातील खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून धोकादायक ठिकाणी सुरक्षा उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी आहे. नाशिक, पुणे या सगळ्याच ठिकाणी खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. नाशिकमध्ये याच खड्डयांच्या मुद्यावरुन काल उद्धव ठाकरे गटाने मोर्चा काढला होता.
सर्वच भागांमध्ये ही खड्ड्यांची समस्या
मागच्या काही दिवसात नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे जवळपास 5 मृत्यू झाले आहेत. या अपघातात पीडित कुटुंबांनी घरातील कर्ते पुरुष गमावले आहेत. राज्यातील सर्वच भागांमध्ये ही खड्ड्यांची समस्या आहे. नागरिक या खड्ड्यांमुळै हैराण झाले आहेत. काही शाळकरी विद्यार्थ्यांनी गंमतीशीर व्हिडिओ बनवून खड्ड्यांच्या या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधलं. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. काल कोंदिवडे गावातील विद्यार्थींनीनी शीवतीर्थवर येऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या मुलींचा सोशल मीडियावरचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. रस्त्यांवरच्या या खड्ड्यांमुळे संसार उद्ध्वस्त होत आहेत. यात भ्रष्टाचाराच सुद्धा अँगल आहे.
