Sushma Andhare : एसपी लवकर आणायचा असतो, हे हवेत विमान थांबवणाऱ्यांना माहीत नाही? भंडाऱ्याच्या घटनेवरून सुषमा अंधारेंचा संताप

| Updated on: Aug 10, 2022 | 3:41 PM

भाजपवाले म्हणतात फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवू. कसे चालवणार? आरोपीची ओळखच पटलेली नसेल आणि आरोपी अद्याप ताब्यातच नसतील तर खटला कसा चालवणार, असा सवाल सुषमा अंधारेंनी भाजपाला केला आहे.

Sushma Andhare : एसपी लवकर आणायचा असतो, हे हवेत विमान थांबवणाऱ्यांना माहीत नाही? भंडाऱ्याच्या घटनेवरून सुषमा अंधारेंचा संताप
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : विमान हवेत 10 मिनिटे थांबवणारे लोक आहेत. एसपी लवकर आणायचा असतो हे त्यांना माहिती नाही, अशी टीका शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. भंडाऱ्यात घडलेल्या घटनेचा निषेध त्यांनी केला. यासंबंधी त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला सवाल केले आहेत. त्या म्हणाल्या, की भंडारा, गोंदिया, नागपूर या तीन जिल्ह्यांचा दौरा केला. पोलिसांना शिवसेनेचे (Shivsena) शिष्टमंडळासह भेटलो. तिकडे जी दुर्दैवी घटना घडली ती वाईट आहे. अन्नाच्या शोधात ती महिला पोलीस स्टेशनमधून बाहेर पडली. तिला वेळीच अडवले असते तर अनर्थ टळला असता. 30 तारखेला ती घराबाहेर पडली. त्यावेळी तिच्यावर पहिला अतिप्रसंग घडला. श्रीराम उरकुडे असे त्या आरोपीचे नाव आहे, तो अद्याप पोलिसांच्या (Police) ताब्यात नाही, असे त्यांनी सांगितले.

‘पीडितेवर चारवेळा अत्याचार’

30 आणि 31 तारखेला अत्याचार पीडित महिला एका हायवेवरील पुलाखाली सापडली. तिला लाखनी गावच्या महिला पोलीस पाटीलने तिला लाखनी पोलीस स्टेशनला आणले. तिथे अगोदरच एका केसच्या संदर्भात कर्मचारी तपास करत होते. त्यामुळे अपुरे मनुष्यबळ पोलीस स्टेशनमध्ये होते. त्यात ही महिला दोन दिवसांपासून उपाशी असल्याने तीन पोलीस स्टेशनमधून बाहेर पडली. तिला कोणी अडवायलाही नव्हते. अशा परिस्थितीत 1 तारखेला एका ढाब्याजवळ ती गेली. तिथे मद्यपान केलेली काही माणसे होती. त्यात लुक्का उर्फ अमित सारवे आणि नजीर अहमद अन्सारी या दोघांनी तिला उचलले, जंगलात नेले आणि अत्याचार केले. आणखी एकाने तिच्यावर अत्याचार केला मात्र अद्याप त्याची ओळख पटू शकलेली नाही.

हे सुद्धा वाचा

सुषमा अंधारेंचे राज्य सरकारला सवाल

‘फास्ट ट्रॅक कोर्टात केस कसे चालवणार?’

भाजपवाले म्हणतात फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवू. कसे चालवणार? आरोपीची ओळखच पटलेली नसेल आणि आरोपी अद्याप ताब्यातच नसतील तर खटला कसा चालवणार, असा सवाल अंधारेंनी भाजपाला केला आहे. तर भंडाऱ्याला काही दिवस एसपीच नव्हता. हे भयंकर असल्याचे अंधारे म्हणाल्या. शिंदे गटात सामील झालेल्या नरेंद्र भोंडेकर यांचे अवैध धंदे आधीच्या एसपी संदीप जाधव यांनी बंद केले होते. त्यामुळे सरकार आल्यावर त्यांनी संदीप जाधवांना हटवले. मात्र त्यांना हटवल्यानंतर दुसरा एसपी आणायचा असतो, हे कोण सांगणार? हवेत 10 मिनिटे विमान थांबवणाऱ्यांना हे माहीन नाही काय, असा सवाल त्यांनी केला. एकूणच या घटनेनंतर राज्य सरकारच्या भूमिकेवर त्यांनी संताप व्यक्त केला.