पुणे / रणजित जाधव : भरधाव कारने ट्रकला मागून धडक दिल्याने भीषण अपघाताची घटना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर घडली आहे. सकाळी 7 ते 7:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात तीन ठारपैकी दोन मृतदेहांची ओळख पटली असून, अन्य एकाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. विजय विश्वनाथ खैर आणि राहुल कुलकर्णी अशी अपघातात मयत दोघांची नावं आहेत. ते सातारा येथील रहिवासी आहेत. अपघात इतका भयानक होता की, यात गाडीचाही चक्काचूर झाला.
मुंबईहून पुण्याच्या दिशेने ही कार चालली होती. यादरम्यान उर्से गावच्या परिसरात आडे गावाजवळ सकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अतिवेगात गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. यानंतर कार थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. या ट्रकचे टायर फुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला थांबला होता. ही धडक एवढी भीषण होती की त्यातील चालकासह दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तिघांचे शीर धडावेगळे झाले.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग आणि शिरगाव परंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महामार्ग पोलिसांनी यंत्रणांच्या मदतीने यातील वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे. तीनही मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आले. मृतांची अधिक माहिती पोलीस घेत आहेत.
सोलापूरजवळील देगाव येथे कांद्याने भरलेल्या मिनी ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात मोटर सायकलस्वार जागीच ठार झाला. सोलापूर शहराजवळ असलेल्या देगाव येथे हॉटेल समृद्धी गार्डन समोर हा अपघात झाला. नारायण फडतरे असे मृत दुचाकी चालक युवकाचे नाव आहे.