मुंबई : राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) दौऱ्यांच्या सपाट्यामुळे पुण्यातल्या मनसैनिकांना नवसंजीवनीची उमेद होती. मात्र त्याच दरम्यान मनसेचा ”वसंत” (Vasant More) पक्षापासून दुरावलाय.मशिदीवरच्या भोंग्याच्या निर्णयाविरोधात वसंत मोरेंनी राज ठाकरेंच्या भूमिकेविरोधात मत मांडलं. आणि गुरुवारी मोरेंना पुण्याच्या शहराध्यक्षपदावरुन दूर करण्यात आलंय. मशिदीवरच्या भोंग्यामुळे मनसेत साईड इफेक्ट उमटणं सुरु झालंय..राज ठाकरेंचा भोंग्याविरुद्धचा आदेश नाकारणाऱ्या वसंत मोरेंना पुणे शहराध्यक्षपदावरुन हटवलं गेलंय. मात्र यात वसंत मोरेंचं नुकसान झालंय, की मग त्यांना हटवून मनसेनं स्वतःहून नुकसान ओढवून घेतलंय, हा सुद्धा प्रश्न आहे! अशातच कधीकाळी मनसेत असलेल्या रुपाली पाटील (Rupali Patil) वसंत मोरेंना राष्ट्रवादीत येण्याचं आमंत्रण देतायत.जो सल्ला मनसे सोडताना वसंत मोरेंना रुपाली पाटलांना दिला होता, त्याच सल्ल्याची आठवण रुपाली पाटील आज त्यांनी करुन देताना दिसल्या.
वसंत मोरें आणि साईनाथ बाबर पुण्यात सध्या मनसेचे हे दोन नगरसेवक आहेत. वसंत मोरेंऐवजी पुण्याच्या शहराध्यक्षपदाची धुरा साईनाथ बाबरांच्या खांद्यावर देण्यात आलीय. वसंत मोरे कात्रजचे नगरसेवक आहेत आणि साईनाथ बाबर कोंढव्यातले. या दोन्ही प्रभागात मुस्लिम मतं महत्वाची आहेत, पण मनसेनं मशिदीवरच्या भोंग्याविरोधात आंदोलन सुरु केल्यामुळे वसंत मोरेंनी नाराजी वर्तवून त्याला विरोध केला. आणि पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे वसंत मोरेंना हटवलं गेलं.
वसंत मोरे पुण्यात मनसेचा चेहरा होते. कोरोना काळात वसंत मोरेंनी कधी कायदा हातात घेऊन, तर कधी स्वतः हॉस्पिटल उभं करुन लोकांना उपचार पुरवले. कात्रज प्रभागाबाहेर अनेकांच्या मदतीला धावले. पुण्यात मनसेच्या गळतीनंतरही पक्षाचं काम जोमानं करत राहिले. वसंत मोरेंच्या कात्रज प्रभागात मुस्लिमांनी 3800 मतं आहेत. त्यामुळे वसंत मोरेंनी भोंगे उतरवण्याच्या आंदोलनाला विरोध केला. मात्र ज्या साईनाथ बाबरांना आता पुण्याचं अध्यक्षपद दिलं गेलंय, त्यांच्या कोंढवा प्रभागात तर 70 टक्के मतदार मुस्लिम आहेत.
दोन दिवसांपूर्वी भोंग्याच्या भूमिकेमुळे स्वतः साईनाथ बाबर यांचीही अडचण झाल्याचा दावा वसंत मोरेंनी केला होता. मात्र आता त्याच साईनाथ बाबरांनी पुणे शहाध्यक्षपदाचा चार्ज घेतल्यामुळे आश्चर्यही व्यक्त होतंय.
दोन महिन्यांपूर्वीच राज ठाकरेंनी पुणे महापालिकेसाठी कंबर कसली होती. नाशिकची जबाबदारी पुत्र अमित ठाकरेंकडे दिली. राज ठाकरे पुण्यात सलग ५ वेळा येऊन गेले. पक्षात उत्साह भरावा म्हणून राज ठाकरे कधी नव्हे ते पदाधिकाऱ्यांच्या घरी जेवले. आपुलकीनं भेटायला आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाचं बारसंही केलं. हात सुजल्यामुळे बैठकीला जास्त काळ न बसू शकलेल्या पदाधिकाऱ्याच्या खांद्याला स्वतः राज ठाकरेंनी मलम लावला.
पक्ष स्थापनेनंतरच्या पहिल्याच निवडणुकीत 11 आमदार जिंकून आणण्याची कमाल राज ठाकरेंनी केली होती. पण मनसेच्या वादळी वाटचालीनं शिवसेनेबरोबर काँग्रेस-राष्ट्रवादीचंही धाबं दणाणलं होतं. मात्र आज नेमकी त्याच्या उलटी स्थिती आहे.. एकाच दमात 11 आमदार निवडून आणणाऱ्या मनसेकडे मुंबई आणि उपनगरांमधलाय 7 महापालिकेत फक्त 8 नगरसेवक उरले आहेत. मुंबई महापालिकेत 1, ठाणे महापालिकेत शून्य, नवी मुंबई महापालिकेत शून्य, कल्याण-डोंबिवली महापालिकेत 8, पनवले महापालिकेत शून्य, वसई-विरारमध्ये 1 आणि मिरा-भाईंदर महापालिकेत शून्य याशिवाय पुण्यात 2, पिंपरी-चिंचवडमध्ये 2, नाशिकमध्ये 5 नगरसेवक आहेत
मनसेचा खरा चेहरा स्वतः राज ठाकरेच आहेत. मात्र आपापल्या प्रभागात ज्यांनी संघटन बांधून ठेवलं, तो एक-एक नेता मनसेतून गळत गेला. मशिदीवरच्या भोंग्याना विरोध करुन राज ठाकरे काय साध्य करतात, हे आगामी निवडणूक ठरवेल. पण तूर्तास भोंग्याच्या भूमिकेमुळे विरोधाचे प्रतिध्वनी मनसेत उमटतायत.
Chandrakant Patil Banner : कोथरुडच्या रस्त्यावर चंद्रकांत पाटील हरवल्याचे बॅनर, कुठे आहेत दादा?
Vasant More Mns : मला फक्त मोदींचाच फोन यायचा बाकी, सेंटीमेंटल वसंत मोरेंना कुणाकुणाची खुली ऑफर?
Vasant More MNS : वसंत मोरेंची राजकीय हत्या का केली? एकेकाळच्या मनसे नेत्या रुपाली पाटलांचा सवाल