Rain | राज्यात आजही वादळी वाऱ्यासह पाऊस, उत्तर महाराष्ट्रात गारपीट

unseasonal rain in maharashtra | राज्यात रविवारी झालेल्या पावसानंतर सोमवारी पुन्हा पाऊस होणार आहे. गारपीटसह अवकाळी पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पावसामुळे तुरी पिकाच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. तर इतर फळे आणि भाजीपाला पिकाचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

Rain | राज्यात आजही वादळी वाऱ्यासह पाऊस, उत्तर महाराष्ट्रात गारपीट
| Updated on: Nov 27, 2023 | 7:48 AM

पुणे, दि. 27 नोव्हेंबर 2023 | महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत रविवारी अवकाळी पाऊस झाला. गारपीट आणि वादळीवाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळला. सोमवारी पावसाचा जोर कायम राहणार आहे. यामुळे हिवाळ्यात पावसाचा अनुभव राज्यातील नागरिकांना येत आहे. हिवाळी मोसमी वारे व चक्रीय वाऱ्यांच्या परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात पाऊस पडत आहे. राज्यातील परभणी, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. राज्यात सोमवार आणि मंगळवारी पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पावसामुळे गारठा, अनेक जिल्ह्यांत रिपरिप

विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. यवतमाळ जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाची रिपरिप सुरूच आहे. हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आहे. विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरूच आहे. वाशिम जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह रात्री एक वाजता अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसामुळे तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तुरीचे पीक सध्या फुलोरा अवस्थेत असल्याने पावसामुळे फुलगळ होणार आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. तर इतर फळं आणि भाजीपाला पिकाचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मागच्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला. तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी भुईसपाट झालीय. मंचर परिसरात वादळीवा-यासह पाऊसाची दमदार बँटीग झाली. मुंबईमध्ये पावसाचे वातावरण कायम आहे.  नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मध्यरात्रीपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे.

नंदुरबारमध्ये मिरचीचे मोठे नुकसान

जळगाव जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोडपून काढले आहे. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, या तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका नंदुरबारमधील मिरची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना बसला आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याकडून खरेदी केलेली जवळपास २० ते २५ हजार क्विंटल मिरची पाण्यात भिजली आहे. यामुळे ३० टक्के मिरची खराब होण्याची शक्यता आहे. मिरची व्यापाऱ्यांचे दोन ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.