शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, अभिनेते राहुल सोलापूरकरांना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची मागणी

अभिनेते राहुल सोलापूरकर यांची एक मुलाखत सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण या मुलाखतीत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, अभिनेते राहुल सोलापूरकरांना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची मागणी
Chhatrapati Shivaji Maharaj and Rahul Solapurkar
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 04, 2025 | 10:54 AM

इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग सर्वांनाच माहीत असेल. विविध पुस्तकं, कादंबऱ्या यांमधून हा प्रसंग अनेकांच्या वाचनाततही आला असेल. मात्र आता याच प्रसंगावरून एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, तर त्यांनी चक्क औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली होती, असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हा दावा केला असून त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सोलापूरकर यांच्या या वक्तव्यावरून राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. “राहुल सोलापूरकर यांचं डोकं फिरलंय, त्यांना ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये टाका,” असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात म्हणाले.

“राहुल सोलापूरकर यांनी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य केलं आहे. याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सचिन खरात गट पक्ष जाहीरपणे निषेध करत आहे. मुळात यांच्या मनातच बहुजन राजांबद्दल द्वेष आहे, हे त्यांच्या वक्तव्यातून जाणवतं. पण आता भाजप सरकार आल्यापासून यांच्या मनातील खरे विचार उफाळून येत आहेत. त्यामुळे राहुल सोलापूरकर यांची ब्राह्मणवादी मानसिकता बाहेर आली. त्यांचं डोकं फिरलय, त्यांना ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करा,” असं सचिन खरात म्हणाले.

राहुल सोलापूरकर नेमकं काय म्हणाले?

“छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटारे-बिटारे काही नव्हते. चक्क लाच देऊन महाराज आले आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्या आहेत, याचेसुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलासुद्धा महाराजांनी लाच दिलेली आहे. मोहसिन खान का मोईन खान नाव आहे बहुतेक त्याचं.. त्याच्याकडून अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडलेत. स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची अजूनही खूण सुद्धा आहे. लोकांना गोष्टी रुपात सांगताना काहीतरी रंजक करून सांगावं लागतं. मग ती रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो किंवा बाजूला टाकला जातो,” असं सोलापूरकर एका मुलाखतीत म्हणाले.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘ही तीच पिलावळ आहे, ज्यांना या मातीतील चार्वाक, बसवेश्वर, बुद्ध, छत्रपती शिवराय, विश्वरत्न बाबासाहेब, म. ज्योतिबा फुले, म. गांधी हे आदर्श मोडीत काढून गोळवलकर, हेडगेवार, मुखर्जी हे नवे आदर्श प्रस्थापित करायचे आहेत. हे सांस्कृतिक राजकारण ओळखा,’ असं ट्विट त्यांनी केलंय.