कुणाल, आई-वडील गेले, उरला फक्त कुत्रा, बिस्कीट दिलं तरी…खवड्या डोंगर प्रकरणात त्या घराच्या भिंतीही रडल्या

छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर घडलेल्या घटनेने महाराष्ट्र हादरला. आयफोन वाचवण्याच्या प्रयत्नातून ५० मिनिटात चांदगुडे कुटुंबातील आई, वडील आणि १९ वर्षीय मुलाचा जीव गेला. कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, त्यांचा पाळीव श्वान मालकाविना एकटाच दुःखात आहे. आता कुणालच्या आजोबांनी त्या मुक्या जीवाच्या सांभाळाची जबाबदारी घेतली आहे.

कुणाल, आई-वडील गेले, उरला फक्त कुत्रा, बिस्कीट दिलं तरी...खवड्या डोंगर प्रकरणात त्या घराच्या भिंतीही रडल्या
| Updated on: Aug 22, 2026 | 7:27 PM

ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर :  हे तेच घर आहे, जिथं 24 तासांपूर्वी एक पती-पत्नी आणि त्यांचा आधार असणारा 19 वर्षाचा मुलगा राहत होता. पण  कुणाल चांदगुडेच्या हट्टापायी वाचवायला गेलेले वडील आणि कुणाल दोघेही खवड्या डोंगरावरुन कोसळून मरण पावले . त्या धक्क्यानं आईनंसुद्धा डोंगरावरुन उडी मारत स्वतःला संपवून घेतलं.  एक आयफोन…50  मिनिटांचा तो डोंगरावरील प्रसंग आणि त्याच 50मिनिटात गेलेले 3 जीव…  छत्रपती संभाजीनगरमधील तिसगाव येथील खवड्या डोंगरावर घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. एकाच कुटुंबातील आई, वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्यानंतर चांदगुडे कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झालं आहे. या अतिशय भयानक आणि तेवढ्याच दुर्दैवी घटनेनंतर त्यांच्या घरात आता माणसांचा वावर नाही, ओळखीच्यांचा आवाज नाही… आता उरलाय तो केवळ एक मुक्या जीवाचा आर्त आवाज.

कुणाल आणि त्याचे आई-वडील गेल्यावर घरातील पाळीव श्वान अगदी एकटा पडला असून त्या मुक्या जीवाच्या डोळ्यांतही दु:ख स्पष्ट दिसतंय. तो फक्त खिडकीतून बाहेर पाहतो आणि अधूनमधून आर्तपणे भुंकतोय. कुणाल चांदगुडे गेली सहा वर्षं या श्वानाचा प्रेमाने सांभाळ करत होता, मात्र आता तोच कुणाल आता या जगात नाही. त्याच्यासोबत त्याचे आई-वडीलही गेल्याने या मुक्या जीवावरही जणू दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रागाच्या भरात कुणाल खवड्या डोंगरावर पोहोचला

मिळालेल्या माहितीनुसार, घरात झालेल्या वादानंतर कुणाल रागाच्या भरात तिसगाव येथील खवड्या डोंगरावर आला. त्याच्या मनात टोकाचे पाऊल उचलण्याचा विचार होता. कुणाल डोंगरावर गेल्याची माहिती मिळताच त्याचे आई-वडीलही आपल्या मुलाला काही बरे-वाईट होऊ नये म्हणून त्याच्या मागे धावत डोंगरावर पोहोचले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गावकरी, सरपंच, पोलीस अधिकारी आणि बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले. कुणालशी संवाद साधून त्याला समजावण्याचा आणि त्याला सुरक्षितपणे खाली आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. बचाव पथकाने खबरदारी म्हणून खाली सुरक्षा जाळीही लावली होती. मात्र कुणाल सतत आपली जागा बदलत असल्याने परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली होती.

काही वेडवाकडं करू नकोस… आपण दोघं राहू

या संपूर्ण प्रसंगात कुणालची आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी अक्षरशः जीवाची बाजी लावत होती. पोटच्या मुलाने टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी ती माऊली सतत त्याची समजूत काढत होती. मुलाच्या जीवासाठी आईची आर्त विनवणी सुरू होती. परिस्थिती कोणत्याही क्षणी हाताबाहेर जाऊ शकते, याची जाणीव सर्वांनाच होती. आई आपल्या मुलाला समजावत असतानाच त्याचे वडीलही कुणालला वाचवण्यासाठी त्याच्याजवळ गेले. मात्र याच दरम्यान दुर्दैवाने कुणालचा तोल गेला. तो खाली कोसळला आणि त्याच्यासोबत त्याचे वडीलही डोंगरावरून खाली पडले. उंचावरून पडल्याने दोघांचाही मृत्यू झाला. डोळ्यांसमोर पती आणि मुलगा दोघांनाही गमावल्याचा जबर धक्का कुणालच्या आईला बसला. काही क्षणांतच तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. या धक्क्यातून सावरायच्या आतच तिनेही त्याच डोंगरावरून खाली उडी घेतली आणि तिचाही मृत्यू झाला.

अख्खं कुटुंब संपल्याने श्वानही स्तब्ध

कालच्या दुर्दैवी घटनेत अख्खं कुटुंब संपलं आणि घरात फक्त एक कुत्रा उरला. वृद्धापकाळात निधनानंतर पोरगा बापाचा खांदेकरी होतो. इथं बाप-लेकासह आईचीही अंत्ययात्रा एकाच वेळी निघाली. चांदगुडे कुटुंबातला मोठ्या मुलाचंही आजारपणानं निधन झालं होतं. त्यामुळे धाकट्या कुणालकडे पाहूनच आई-बाप जगत होते. मात्र या कुटुंबासोबत जे घडलं ते ऐकून कोणत्याही संवेदनशील माणसाचं काळीज हादरुन जाईल. गल्लीतल्या आणि गावातल्यांसकट ज्यांनी-ज्यांनी ही दुर्घटना पाहिली त्यांची मनं थक्क झाली.  कधीकाळी या घरात कुणालची आई कामाहून परतणाऱ्या पतीची वाट पाहत असेल. कॉलेजमधून येणाऱ्या मुलाकडे तिचे डोळे लागले असतील…आज वाट पाहणारी ती महिला, तिचा पती आणि मुलगा तिघंही जगात नाहीयत…आणि 24 तास उलटूनही घरातल्यांपैकी एकही जण न परतल्यामुळे मुका कुत्राही स्तब्ध आहे.

गेल्या सहा वर्षांपासून कुणाल या श्वानाचा सांभाळ करत होता. त्याच्यासाठी वेळ काढणे, त्याला खाऊ देणे आणि त्याची काळजी घेणे हे कुणालच्या दैनंदिन आयुष्याचा भाग होते. अचानक कुणालच नाहीसा झाल्याने या मुक्या जीवालाही आपल्या मालकाची उणीव जाणवत असल्याचे दृश्य हृदयद्रावक आहे. घराच्या खिडकीतून येणारा त्याचा आर्त आवाज ऐकून परिसरातील नागरिकांचेही डोळे पाणावतात. माणसांच्या दुःखाला शब्द असतात; मात्र या मुक्या जीवाला आपला मालक कायमचा निघून गेल्याचे दुःख केवळ त्याच्या आक्रोशातूनच व्यक्त करता येत आहे.

आजोबांनी दिली बिस्किटं; आता बबनराव गाभुड करणार सांभाळ

कुणालच्या मृत्यूनंतर त्याच्या पाळील श्वानाचा कोण सांभाळणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र आता कुणालच्या आजोबांनी पुढाकार घेतला असून या मुक्या जीवाची जबाबदारी बबनराव गाभुड यांनी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.  आज कुणालचे आजोबा बबनराव गाभुड यांनी त्याच्याकडे मायेने पाहत त्याला बिस्किटं दिली.  खवड्या डोंगरावरील या घटनेने एका कुटुंबातील तीन जीव हिरावून घेतले. मागे राहिल्या त्या आठवणी, एक ओसाड घर आणि आपल्या मालकाची वाट पाहणारा एक मुका जीव.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us