
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या इयत्ता सहावीत शिकणाऱ्या एका ११ वर्षीय निष्पाप विद्यार्थिनीवर अज्ञात नराधमाने ॲसिड हल्ला केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. यामुळे पालकांमध्ये प्रचंड भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.
संगमनेरमधील वडगाव पान या ठिकाणी शाळेत ही मुलगी शिक्षण घेत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शाळा सकाळी भरतात. सकाळी ११:३० ते १२:४५ च्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ही मुलगी सायकलवरून आपल्या घराच्या दिशेने निघाली होती. गावच्या रस्त्याने जात असताना एका अज्ञात युवकाने तिला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवले. काही समजण्याच्या आतच त्या नराधमाने या चिमुकलीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. यानंतर त्याने तिथून पळ काढला.
या अनपेक्षित हल्ल्यामुळे मुलगी वेदनेने विव्हळू लागली. तिने आरडाओरड केल्यावर आसपासचे नागरिक तातडीने मदतीसाठी धावून आले. नागरिकांनी तिला प्रथम स्थानिक डॉक्टर जम्बुकर हॉस्पिटलमध्ये नेले. त्यानंतर पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा नगर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने युद्धपातळीवर तपास सुरू केला आहे.
संगमनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून आरोपीच्या शोधासाठी १० विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, मुलीचा चेहरा उजव्या डोळ्याच्या बाजूने ७ टक्के भाजला आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असून ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.पीडित मुलीची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत गरीब आहे. वडिलांचे छत्र हरवलेल्या या मुलीची आई मोलमजुरी करून घर चालवते.
या घटनेवर राजकीय स्तरातूनही तीव्र संताप व्यक्त होत आहे. आमदार चित्रा वाघ यांनी हा प्रकार अत्यंत संतापजनक असून शासन कोणतीही तडजोड करणार नाही. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल,” असे म्हटले आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री आणि पालकमंत्री विखे पाटील स्वतः लक्ष ठेवून आहेत, असेही चित्रा वाघ यांनी सांगितले. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी तपास अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आरोपीला तात्काळ बेड्या ठोकण्याचे निर्देश दिले आहेत. महिला आणि बालकांच्या सुरक्षेबाबत ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका त्यांनी मांडली आहे. या अमानुष हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.