
सांगली : सांगली (Sangali) जिल्ह्यातील शिराळा (shirala) तालुक्यातील रिळे (rile village) येथील पाटील दरा नामक शिवारात गेल्या दोन दिवसांमध्ये पाच गवे संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळून आले आहेत. विषबाधा झाल्याने या गव्यांचा मृत्यू (animal death) झाल्याचा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. वैद्यकीय तपासणी करून झाल्यानंतर या गव्यांचे जागेवरच दहन करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, रविवार शिराळा तालुक्यातील पावलेवाडी खिंडीत वयोमानामुळे मृत झालेला गवा आढळला. दोन दिवसांत सहा गव्यांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्या परिसरात वनअधिकारी अधिक लक्ष ठेऊन आहेत.
याबाबत घटनास्थळावरून वन विभागाकडून देण्यात आलेली माहिती, रविवार सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास रिळे येथील वनविभाग सर्वे नंबर 234 च्या लगत 2 नर व 1 मादी असे तीन गवे संशयास्पदरित्या मृतावस्थेत असल्याची माहिती वनविभागाला समजली. त्यानंतर वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल चंद्रकांत देशमुख, वनपाल सुरेश चरापले, वनरक्षक हणमंत पाटील, प्रकाश पाटील, अमोल साठे व पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
हे प्रकरण अधिक गंभीर असल्याचं लक्षात आल्यानंतर वनविभागाच्या टीमने परिसरात शोध घेतला, त्यावेळी त्यांना परिसरात एकूण 5 गवे संशयितरित्या मृतावस्थेत आढळून आले. मृत गव्यांपैकी दोन गव्यांचे मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्याने त्यांची प्राथमिक तपासणी करून अहवाल तयार करण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी अंबादास माडकर, शुभांगी अरगडे यांनी मृत झालेल्या सर्व गव्यांची उत्तरीय तपासणी केली.
शिराळा तालुक्याला नैसर्गिक वरदान असल्यामुळे तिकडच्या गावात राहणाऱ्या लोकांना नेहमी प्राणी दिसतात. त्याचबरोबर चांदोली अभायरण्य जवळ असल्यामुळे गव्यांचा शिराळा तालुक्यात अधिक वावर आहे. अनेकदा गव्यांनी शेतकऱ्यांच्या पीकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. गव्यांना विषबाधा कशी झाली याचा अधिकारी शोध घेणार आहेत.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यात गव्यांची संख्या अधिक आहे. काढणीला आलेल्या पीकांचं नुकसान अनेकदा गव्यांनी केलं आहे. त्याचबरोबर गवा हल्ला करीत असल्यामुळे त्याच्या आसपास सुध्दा कुणी फिरकत नाही.