Loud Speaker Row: काही हौशे नौशे गवशे असतात, राज ठाकरेंच्या ‘त्या’ व्हिडीओ ट्विटवर संजय राऊतांचं तिखट उत्तर

| Updated on: May 04, 2022 | 11:12 AM

राज्यभरातील मशिदींवरील भोंगे आणि अजानच्या आवाजावर मनसैनिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. मनसेच्या या आंदोलनामुळे राज्यात संवेदनशील वातावरण निर्माण झालं असून हे आंदोलन केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

Loud Speaker Row: काही हौशे नौशे गवशे असतात, राज ठाकरेंच्या त्या व्हिडीओ ट्विटवर संजय राऊतांचं तिखट उत्तर
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः आंदोलन काय असतं हे शिवसेनेला (Shiv Sena) माहिती आहे. महाराष्ट्रात आंदोलनाचा सर्वाधिक अनुभव शिवसेनेला आहे. फुटकळ प्रसिद्धीसाठी आंदोलन करणारे हौशे नौशे गवशे असतात. त्यांनी बाळासाहेबांचे जुने व्हिडिओ टाकून आम्हाला शिकवू नये. बाळासाहेब (Balasaheb Thackeray) आमचा श्वास आहे. त्यांच्यामुळेच इतिहासात भोंग्यांबद्दलचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिलं, तुम्ही आम्हाला काय सांगता, असा तिखट सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरेंना केला. राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम दिल्यानंतर, याचे पालन न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा रस्त्यावरील नमाज आणि मशिदींवरील लाऊडस्पीकरबाबत इशारा देण्याचा व्हिडिओ ट्वीट केलाय. राज्यभरातील मशिदींवरील भोंगे आणि अजानच्या आवाजावर मनसैनिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. मनसेच्या या आंदोलनामुळे राज्यात संवेदनशील वातावरण निर्माण झालं असून हे आंदोलन केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

‘काहींना आंदोलनाचा छंद..हौशे नौशे गौशे..’

मनसेच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी मुळात हे आंदोलन असल्याचंच नाकारलं. ते म्हणाले, ‘कुठं आंदोलन आहे? मला कुठे आंदोलन दिसलं नाही. मुंबईत महाराष्ट्रात भोंगेच नसतील आणि तुम्ही तुमचे भोंगे पेकत असतील लावणार असाल तर तुम्ही आंदोलन करताय की बेकायदेशीर कृत्य करत आहात. आंदोलन काय असतं हे बघा आंदोलनाचा सर्वात जास्त अनुभव शिवसेनेला आहे. माझ्या बाजूला शिशीर शिंदे आहेत. ते आंदोलनाचे जनक आहे. कशी आणि का करायची हे शिवसेनेकडून शिका. प्रसिद्धीसाठी आंदोलनं नसतात. आम्ही ५० वर्ष आंदोलन करत आहोत. आम्ही सत्तेत असलो तरी आंदोलनाशी आमचा संबंध आहे. काही लोकांचे छंद असतात. काही लोक राजाकराणात हौशे नौशे गवशे असतात. त्यांना राजकीय बळ प्रेरणा मिळत असते सर्व बाबतीत. त्यातून हे प्रकार घडत असतात. पण महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार आहे. बाळासाहेबांचे पुत्रं आहेत. त्यामुळे रस्त्यावरील नमाजबाबत काय करायचं आणि बेकायदेशीर भोंग्याबाबत काय करायचं याचे सल्ले कुणी देऊ नये…

‘…त्यांना बाळासाहेबांच्या कॅसेट पाठवून देऊ’

संजय राऊत पुढे म्हणाले,’ बाळासाहेबांचे जुने काय प्राचीन व्हिडीओ टाकले तरी त्यांनी आम्हाला बाळासाहेब शिकवू नये, त्यांनी पुन्हा पुन्हा बाळासाहेब तपासले पाहिजे. शिवसेनेचा आणि शिवसेनाप्रमुखांचा इतिहास सांगायला आम्ही काही खाली बसलो नाही. आजही आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने चाललो आहोत. आमचा श्वास बाळासाहेब आहेत. आम्हाला काय सांगतो? त्यांनी भोंग्याबाबत नमाजबाबत भूमिका घेतली. त्यांनी नमाजावर तोडगा दिला. भोंगे उतरवा बाळासाहेब सांगत होते. ते बंद झाले. कोर्टाने हस्तक्षेप केला.आणि देशात एकच कायदा तयार झाला. हा इतिहास समजत नसेल तर त्यांनी बाळासाहेब समजून घ्यावे. त्याविषयी बाळासाहेबांचे कॅसेट पाठवून देऊ..’

राज ठाकरेंनी ट्वीट केलेला बाळासाहेबांचा व्हिडिओ असा-

‘यामुळे देश अशांत होईल’

मनसेच्या अशा पवित्र्यामुळे महाराष्ट्रात तसेच देशात अशांतता निर्माण होऊ शकते, अशी भीती संजय राऊत यांनी व्यक्त केली. ते म्ङणाले, ‘ मुंबईत मशिदीवर भोंगे आहेत. त्यांनी परवानग्या घेतल्या आहेत. त्यांनी आवाजाचं पालन करण्याचं मान्य केलं. हाच नियम मंदिर आणि चर्चला आहे. इतर सार्वजिनक कार्यक्रमांना आहे. सर्वांनी पालन केलं. तर सर्वोच्च न्यायालयाचा मान राखला जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत नसेल तर समान नागरी कायद्याची भाषा का करता ? प्रत्येकाने धर्माच्या पलिकडे जाऊन कोर्टाचं पालन करावं. धर्माच्या वर कायदा आहे. आम्ही पालन करतो. इतरांनी पालन करावं. असं असताना कोणी चिथावणीची भाषा करत असेल तर समान नागरी कायद्याचं उल्लंघन आहे. महाराष्ट्रात कोणी चिथावणीची भाषा करत असेल अशा प्रकारे चिथावणईची भाषा करत असेल.. फक्त राजकीय स्वार्थासाठी केंद्रात बसलेला पक्ष अशा प्रकारे चिथावणीखोरांना बळ देत असेल,  तर मोदी देशाचे गृहमंत्री शहा यांनी या गोष्टीची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. राज्य नाही तर देश अशांत होईल’ अशी भीती संजय राऊत यांनी व्यक्त केली.