
बीडच्या माजलगावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराड आणि त्याच्या साथीदारांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सरकारी वकिलांनी त्यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी करणारा अर्ज बीडच्या विशेष मोक्का (MCOCA) न्यायालयात दाखल केला आहे. आज यावर कोर्टाकडून महत्त्वपूर्ण निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सध्या सर्वांचेच लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.
संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे बीड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये त्यांनी वाल्मीक कराड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यात असलेल्या जमिनीच्या भागीदारीचे काही कागदपत्रे पोस्ट केले होते. त्यामुळे जर आता न्यायालयाने वाल्मीक कराडच्या इतर संपत्तीसह या एकत्रित मालमत्तेवरही जप्तीचे आदेश दिले, तर धनंजय मुंडे यांना मोठा दणका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या जप्तीमुळे त्यांच्यासाठी हे एक मोठे आव्हान ठरु शकते. या शक्यतेमुळे बीडच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क वर्तवले जात आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करताना पोलिसांनी वाल्मीक कराड आणि त्याच्या साथीदारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. या कायद्यानुसार, गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद आहे. जेणेकरून गुन्हेगारी कृत्यांना आळा घालता येईल. सरकारी पक्षाचा अर्ज याच तरतुदीवर आधारित आहे. जर न्यायालयाने सरकारी वकिलांचा अर्ज मान्य केला, तर वाल्मीक कराड आणि त्याच्या साथीदारांवर आर्थिक निर्बंध येण्याची शक्यता आहे.
धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन !
हे घ्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे याचे धडधडीत पुरावे.
कंपनी एकत्र, जमीन एकत्र
जगमित्र शुगर्स चे ६ सातबारे मी डिजिटली डाउनलोड केले
३५५४ गुंठे जमीन (८८ एकर ३४ गुंठे) pic.twitter.com/afpORBwTRh
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 23, 2024
सध्या सुरू असलेल्या राजकीय आणि न्यायालयीन घडामोडींमुळे बीडमधील वातावरण तापले आहे. धनंजय मुंडे यांच्यासोबतच्या कथित एकत्रित मालमत्तेवर जप्तीची कारवाई झाल्यास हा मुंडेंना मोठा धक्का असेल. तसेच याचे राजकीय परिणाम काय होतील, याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर या प्रकरणाची पुढील दिशा अवलंबून आहे. यामुळे, आजचा निर्णय केवळ वाल्मीक कराडसाठीच नाही, तर बीडच्या राजकीय भविष्यासाठीही महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकरणात पोलिसांचा तपास, सरकारी वकिलांची बाजू आणि न्यायालयाचा निर्णय हे सर्व घटक खूप महत्त्वाचे आहेत. यामुळे, बीड जिल्ह्यातील वातावरण तापले आहे.