‘गावाच्या विकासासाठी मित्र, मात्र राज्यात शत्रू’, कल्याणच्या मानिवली ग्रामपंचायतीत शिवसेना-भाजप युती

| Updated on: Feb 10, 2021 | 5:48 PM

कल्याण तालुक्यातील मानिवली गावात सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडीवेळी शिवसेना आणि भाजप यांच्यात युती झाली आहे (ShivSena and BJP alliance in Kalyan Manivali gram panchayat)

गावाच्या विकासासाठी मित्र, मात्र राज्यात शत्रू, कल्याणच्या मानिवली ग्रामपंचायतीत शिवसेना-भाजप युती
Follow us on

कल्याण (ठाणे) : शिवसेना आणि भाजपमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनेक ठिकाणी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही एकमेकांविरोधात कमालीची फूट पडली आहे. शिवेसना-भाजप कार्यकर्ते एकमेकांविरोधात ठाकले आहेत. तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये दृढ संबंध होताना दिसत आहे. असं असतानादेखील कल्याण तालुक्यातील मानिवली गावात सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडीवेळी शिवसेना आणि भाजप यांच्यात युती झाली आहे. विशेष म्हणजे भाजप आमदार किसन कथोरे यांनी या युतीचं समर्थनदेखील केलं आहे (ShivSena and BJP alliance in Kalyan Manivali gram panchayat).

मानिवली ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना-भाजपने एकत्रित येत भाजपचा सरपंच तर शिवसेनेचा उपसरपंच बसविला आहे. राज्यात काही वाद असो गावाच्या विकासासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत, असं वक्तव्य निवडून आलेल्या सरपंच-उपसरपंचांनी केलं आहे (ShivSena and BJP alliance in Kalyan Manivali gram panchayat).

कल्याण तालुक्यातील उर्वरीत दहा ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आणि उपसरपंचपदाची निवडणूक आज पार पाडली. सरपंचपदासाठी सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. याशिवाय प्रत्येक पक्षाने आपला सरपंच बसवण्याच्या दावा केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. मात्र कल्याण तालुक्यातील मानिवली ग्रामपंचायतीमध्ये एक-दुसऱ्याला पाण्यात बघणारे पक्ष एकत्र आले आहेत.

नऊ सदस्य असलेल्या मानिवली ग्रामपंचायतीमध्ये तीन शिवसेनेचे, तीन भाजपचे आणि तीन इतर निवडून आले होते. सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप एकत्रित आले. त्यामुळे सरपंचपदी भाजपच्या माया गायकर या बिनविरोध निवडून आल्या. तर शिवसेनेचे चंद्रकांत गायकर हे उपसरपंचपदी निवडून आले. या दोन्ही पक्षाला एकत्रित आणण्यासाठी ठाणे, पालघर जिल्ह्याचे भाजप सचिव निलेश शेलार यांनी महत्वाची भूमिका बजावली. दरम्यान, राज्यात काही असू द्या गावाच्या विकासाठी आम्ही एकत्रित आल्याची भावना नवनियुक्त सरपंच आणि उपसरपंचांनी व्यक्त केली आहे.

सरपंच निवडीवेळी भाजपचे मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे हे देखील उपस्थिता होते. “गावाच्या विकास कामात राजकारण होता कामा नये. गावकऱ्यांनी विकासाकरीता  एकत्रित येण्याचे ठरविले असेल. त्याला भाजपचा पाठिंबा आहे”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

हेही वाचा : कलाकार हे एकेकाळी भाई लोकांच्या इशाऱ्यावर चालायचे, केंद्र सरकारने भाईगिरी कधीपासून सुरु केली? : नाना पटोले