देशाला पंतप्रधान, गृहमंत्र्यांची गरज, घरफोड्यांची नाही…; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मुंबईत शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि त्यांच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता राजकीय वातावरण तापल्याचे दिसून आले. ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या प्रेमाबद्दल आभार मानले आणि शिवसेनेच्या भविष्याबाबत आशा व्यक्त केली.

देशाला पंतप्रधान, गृहमंत्र्यांची गरज, घरफोड्यांची नाही...; उद्धव ठाकरेंचा घणाघात
uddhav thackeray
| Updated on: Jun 19, 2025 | 8:59 PM

मुंबईत शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित वर्धापन दिन सोहळ्यात भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.

भाजपने पाळलेली बेडकं आज डराव डराव करतील

उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या सोहळ्यात भाजपवर निशाणा साधताना म्हणाले, “भाजपने पाळलेली बेडकं आज डराव डराव करतील. ही पाळीव बेडकं डोळ्यासमोर येतात. या चोरांना खरंच मी म्हणेल लाज, लज्जा, शरम ठेवली नाही. तसेच नॅपकिन आहे, तो तरी का ठेवला आहे, असा हा भाजप, असेही ते पुढे म्हणाले.

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “कुणाच्याही नशिबात किंवा भाग्यात असं प्रेम लिहिलं असेल. ही माझी पुण्याई नाही. ही माझ्या माझ्या पूर्वजांची पुण्याई आहे. तुमच्या सर्वांचं अतोनात प्रेम आहे. काही लोकांनी शिवाजी पार्कात मैदानात घ्यायची घाई करू नका म्हणून सांगितलं. पण शिवसेनाप्रमुख म्हणाले, काय व्हायचं ते होईल, पण मी शिवाजी पार्कात सभा घेईन. शिवाजी पार्कात सभा घेतली. मी समोर माँ सोबत बसलो होतो. आज जे दाढी खाजवतात, ते कुठे होते माहीत नाही.” अशी आठवण उद्धव ठाकरेंनी सांगितली.

केंद्रात सरकार आल्यापासून पनवती लागली

“ज्यांना राजकारणात पोरं होत नाहीत, ते आमच्यावर टीका करतात. अरे तुला पोरं होत नाहीत, आम्ही काय करू? भाजपचे लोक असेच आहेत. आपण सत्य नाकारतो का कधी? त्यांना आजपर्यंत कधी पोरं झाली नाहीत, म्हणून दुसरे नेते स्वीकारायचे आणि त्यांना मोठं करायचं. दुर्देव असं की, ज्या सरदार पटेलांनी संघावर बंदी आणली, त्याच सरदार पटेलांचा सर्वात मोठा पुतळा उभारला. हे यांचं हिंदुत्व, असा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

निवडणूक जिंकण्यासाठी माता-भगिनींशी केलेला वादा, जनतेशी केलेला वादा पाळत नाहीत. मग तो पक्ष माझ्याशी केलेला वादा कसा पाळेल? अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा वादा नव्हता म्हणतात. मग माता-भगिनीला केलेला वादा खरा होता की नव्हता? केंद्रात सरकार आल्यापासून पनवती लागली आहे. मंदिराचं छत गळतंय, विमान अपघात झाला, रेल्वे अपघात झाला, कोणी जबाबदारी घेत नाही. मेट्रोत पाणी भरलं. आज देशाला पंतप्रधानाची गरज आहे, भाजपला पंतप्रधान आहे. देशाला नाही. देशाला गृहमंत्र्यांची गरज आहे, घरफोड्या अमित शाहची नाही. देशाला संरक्षण मंत्र्याची गरज आहे, गुंडाला संरक्षण देणाऱ्या देवेंद्र आणि राजनाथ सिंगाची नाही. तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री आहात की गुंडांचे? तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात की तुमच्या पक्षाचे घरफोडे मंत्री आहात?” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी घणाघात केला.

इंडिया आघाडीची तुलना इंडियन मुजाहिद्दीनशी करायला लाज वाटली नाही?

“मोदींना विचारतोय, पंतप्रधानांना कठोर शब्दात बोलणं योग्य नाही. इंडिया आघाडी उभी केली, तर इंडियन मुजाहिद्दीन बरोबर आमची तुलना करायला लाज वाटली नाही? जर आम्ही इंडियन मुजाहिद्दीन सारखे होतो, तर तुम्ही न केलेल्या शौर्याचं कौतुक जगात करायला आमच्या पक्षाचे खासदार का पाठवले?” असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.