पत्नीला मोबाईलचं वेड लागलं अन् एका नकारामुळे संपूर्ण कुटुंब संपलं; नेमकं काय घडलं?

बीडच्या लिंबारुईमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मोबाईल फोनच्या शुल्लक कारणावरून आईने आपल्या ४ वर्षांच्या मुलाची हत्या करून स्वतःही आत्महत्या केली. या प्रकरणाच्या पोलीस तपासातील धक्कादायक माहिती सविस्तर वाचा.

पत्नीला मोबाईलचं वेड लागलं अन् एका नकारामुळे संपूर्ण कुटुंब संपलं; नेमकं काय घडलं?
beed crime
| Updated on: Feb 02, 2026 | 1:39 PM

बीड जिल्ह्यामध्ये नात्याला काळिमा फासणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने नवीन मोबाईल फोन घेऊन दिला नाही या एका किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण दुर्घटनेत झाले. रागाच्या भरात एका मातेने आपल्या अवघ्या चार वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याला विहिरीत ढकलून त्याचा जीव घेतला. यानंतर तिने स्वतःही त्याच विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे. तसेच सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

बीड तालुक्यातील लिंबारुई येथे ३१ डिसेंबर रोजी घडलेल्या या माय-लेकाच्या मृत्यूच्या प्रकरणाला आता पोलीस तपासात एक भयानक वळण मिळाले आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवशी विहिरीत दोन मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र त्यावेळी हे मृत्यू नेमके कशामुळे झाले हे अस्पष्ट होते. अखेर बीड ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक चौकशीतून हे विदारक सत्य समोर आले आहे. मोबाईलच्या हट्टापायी एका मातेने स्वतःच्याच हसत्या-खेळत्या संसाराची राखरांगोळी केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस प्रशासनही अवाक झाले आहे.

नेमकं काय घडलं?

३१ डिसेंबर २०२५ रोजी वर्षाचा शेवटचा दिवस असताना लिंबारुई शिवारातील एका विहिरीत दोन मृतदेह तरंगताना आढळले होते. प्राजक्ता उर्फ रामेश्वर दराडे आणि तिचा चार वर्षाचा मुलगा अशी मृतांची ओळख पटली होती. सुरुवातीला ही आत्महत्या असावी असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, ग्रामीण पोलिसांनी जेव्हा मृताच्या नातेवाईकांकडे आणि परिसरात चौकशी केली, तेव्हा संशयाची सुई घरगुती वादाकडे वळली.

यावेळी तपासादरम्यान समोर आले की, प्राजक्ता यांना नवीन मोबाईल फोन हवा होता. त्यासाठी त्या पतीकडे वारंवार हट्ट करत होत्या. मात्र आर्थिक परिस्थिती किंवा इतर कारणांमुळे पती मोबाईल घेऊन देण्यास टाळाटाळ करत होता. याच वादातून ३१ डिसेंबरला त्यांच्यात पुन्हा खटका उडाला. यानंतर रागाच्या भरात प्राजक्ता यांनी टोकाचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या निष्पाप मुलाला सोबत घेतले आणि विहीर गाठली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विहिरीवर गेल्यावर प्राजक्ता यांनी आधी चार वर्षांच्या वेदांतला विहिरीच्या पाण्यात ढकलून दिले. मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी स्वतः विहिरीत उडी घेतली. एका मोबाईलच्या हट्टापायी आईनेच मुलाचा काळ बनणे, ही बाब बीडकरांच्या मनाला चटका लावून जाणारी ठरली आहे. याप्रकरणी आता खुनाचा आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.