काय झाडी, काय डोंगार…हे एकच महिना चाललं, नंतर…; रोहित पवारांचा हल्लाबोल…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहटीला दर्शनाला चालले आहेत की त्यांच्या गटात वेगळा वाद आहे असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.

काय झाडी, काय डोंगार...हे एकच महिना चाललं, नंतर...; रोहित पवारांचा हल्लाबोल...
Reporter Sandip Shinde | Edited By: महादेव कांबळे | Updated on: Nov 07, 2022 | 9:22 PM

सोलापूरः सध्या राज्यातील राजकीय वातावरण अनेक कारणांनी ढवळून निघाले आहे. त्यामुळे आजच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस गटातील शहाजी पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी ते म्हणाले की, शहाजी पाटील यांनी “काय झाडी, काय डोंगार” या डायलॉगमुळे त्यांना एक महिना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. मात्र त्यानंतर त्यांना काहीच प्रसिध्दी मिळाली नसल्याची टीकाही त्यांच्यावर करण्यात आली. त्यामुळे आता काय करायचा हा प्रश्न त्यांच्या समोर उभा होता. मग राष्ट्रवादीवर बोलल्यावर प्रसिद्धी मिळेल का? या कारणामुळे ते प्रसिद्धी मिळण्याच्या नादात शहाजी पाटील बोलत सुटले असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहटीला दर्शनाला चालले आहेत की त्यांच्या गटात वेगळा वाद आहे. हे आता पाहावे लागेल असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सगळचं अलबेल चाललं आहे असं नाही असंही त्यांनी या दौऱ्याविषयी बोलताना स्पष्ट केले.

विधानसभा, लोकसभा निवडणुका जवळ आल्यानंतर पूनम महाजन बोलतात. एवढे वर्षे झाल्यानंतर कसे काय बोलल्या असा सवालही त्यांनी पूनम महाजन यांना केला आहे.

‘हरहर महादेव’ या चित्रपटात चुकीच्या गोष्टी दाखवल्या गेल्या असून चुकीचा इतिहास मांडला जात आहे. त्यामुळे जनता हे सहन करणार नाही. त्यामुळे छत्रपती संभाजी राजे यांच्या भुमिकेला आमचा पांठिबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सत्तेत असलेल्या शिंदे गटाचे 40 आमदार राहतील का? हेच पहावे लागणार आहे. त्यांना सांभाळण्यात या सरकारची ताकद वाया जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

खासदार श्रीकांत शिंदे युवासेनाप्रमुख होणार नाहीत. त्यामुळे युवा शिवसेना ठाकरे गटाकडेच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी जाहीर सभेतून वेळ काढून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करुन अडचणी जाणून घ्यायला हव्या होत्या असा टोला त्यांनी श्रीकांत शिंदे यांना लगावला.

श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करत असताना त्यांनी खासदार सुजय विखेंचाही समाचार घेतला. यावेळी ते म्हणाले की, अख्या महाराष्ट्राला माहिती आहे की, राष्ट्रवादीचे नेतृत्व 55 वर्षापासून शरद पवार हेच करीत आहेत. त्यामुळे खासदार सुजय विखेंनी त्यांच्या वडिलांना एकदा विचारावे अशी टीका त्यांनी विखें यांच्यावर केली आहे.

Follow Us