Sunetra Pawar : हजारो लोकांच्या नोकऱ्यांवर संकट येताच सुनेत्रा पवार अॅक्शन मोडमध्ये; तातडीने उचललं मोठं पाऊल
चाकणमधील जवळपास 20 कंपन्या स्थलांतरित होणार आहेत. या मुद्द्यावरून सुनेत्रा पवार अक्शन मोडमध्ये आले आहेत. यावर सुनेत्रा पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील चाकणच्या MIDC मधील 20 कंपन्या महाराष्ट्र सोडणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. चाकणमधील खड्डे आणि वाहतूक कोंडीला कंटाळून कंपन्या स्थलांतरित करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. खराब रस्त्यामुळे चाकणमधील कंपन्या महाराष्ट्राबाहेर किंवा राज्यातील अन्य जिल्ह्यात स्थलांतरित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अॅक्शन मोडमध्ये आल्या आहेत. चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्यानं सोडवणार असल्याची प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी दिली आहे.
चाकणच्या MIDC मधील उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार पातळीवर हालचाली वाढल्या आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी येत्या 16 ऑगस्ट रोजी 4 वाजता उद्योजक आणि औद्योगिक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष बैठक घेणार आहेत. आता या प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही विशेष लक्ष घातलं आहे. सुनेत्रा पवार यांनीही या समस्येवर ठोस तोडगा काढण्यात येईल, असे सूचित केले आहे.
चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्यानं सोडवणार!
चाकण एमआयडीसीतील रस्ते, वाहतूक तसंच अन्य पायाभूत सुविधांशी संबंधित अडचणी प्राधान्यानं सोडवण्यात येतील. या समस्यांवर तातडीनं मार्ग काढण्यासाठी चाकण येथील उद्योजक, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक प्रशासन तसंच जिल्हा प्रशासनासोबत…
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) August 14, 2026
सुनेत्रा पवार यांची पोस्ट जशीच्या तशी
सुनेत्रा पवार यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, ‘चाकण एमआयडीसीतील रस्ते, वाहतूक तसंच अन्य पायाभूत सुविधांशी संबंधित अडचणी प्राधान्यानं सोडवण्यात येतील. या समस्यांवर तातडीनं मार्ग काढण्यासाठी चाकण येथील उद्योजक, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक प्रशासन तसंच जिल्हा प्रशासनासोबत लवकरच बैठक घेण्यात येईल.या संदर्भात आज चाकण नागरी कृती समिती व औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी धनंजय शेडबाळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या तसंच त्या सोडवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत त्यांना आश्वस्त केलं’.
‘या प्रश्नांच्या अनुषंगानं एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी,पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, खेडचे प्रांत अधिकारी अनिल दौंडे आणि चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. चाकणच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा सक्षम करणं ही प्राथमिकता आहे. सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन समन्वयानं या समस्यांवर लवकरच ठोस मार्ग काढण्यात येईल, असे सूचित केले.