राजकीय ‘उद्योग’ बंद करा, हिंमत असेल तर चर्चेला या; रोहित पवार यांचं उदय सामंत यांना थेट चॅलेंज
चाकण MIDC मधील उद्योगांचे स्थलांतर व बंद पडणाऱ्या कंपन्यांवरून रोहित पवारांनी उद्योगमंत्री उदय सामंतांना थेट आव्हान दिले. २० कंपन्या बंद पडल्याने २ हजार कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. राज्य सरकार उद्योगांना पुरेसे इन्फ्रास्ट्रक्चर देत नसल्याने महाराष्ट्र उद्योगात पिछाडीवर पडत असल्याचा आरोप पवार यांनी केला.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आधी इतर राजकीय उद्योग बंद करावेत. मी तुम्हाला आव्हान देतो. माझ्यासोबत चर्चेला या. संयुक्त पत्रकार परिषद बोलावू. त्यात मी पुराव्यानिशी आकडेवारी सादर करतो. तुमच्यात धाडस असेल तर या समोर, असं आव्हानच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना दिलं आहे. पुण्याच्या चाकण एमआयडीसीतून उद्योगांचे स्थलांतर होत आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सामंत यांना चांगलंच घेरलं.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चाकण एमआयडीसीचा मुद्दा उपस्थित केला होता. चाकण एमआयडीसीती कंपन्या सुविधांच्या अभावी स्थलांतर करण्याच्या मार्गावर आहेत. 20 कंपन्या टाळं लावणार आहेत. त्यामुळे सुमारे दोन हजार कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित होणार आहे. राज्यासाठी ही गोष्ट निश्चित चांगली नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांनी त्यात लक्ष घालावे, असं आवाहन शरद पवार यांनी केलं होतं. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत, ज्या कंपन्यांची नोंदणी आहे, पण त्या कधी सुरूच झाल्या नाहीत, त्या बंद होत असल्याचं म्हटलं होतं. या सर्व पार्श्वभूमीर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकार आणि उद्योग मंत्र्यांवर हल्लाबोल केला.
तुम्ही आकडे सांगा. या सरकारमध्ये धमक आहे का? आमच्याशी चर्चा करायला. आम्ही खरे आकडे देऊ. सरकारकडून उत्तर द्यायला समोर या. उद्योगमंत्र्यांनी राजकीय उद्योग करणं बंद करावं आणि आमच्यासमोर येऊन आकडे सादर करा, असं रोहित पवार म्हणाले.
हे आमचं धाडस, बाकीच्यांचं…
भाजपच्या बोलणाऱ्या आमदारांना उद्योग आणि विकास काय हे माहीत नाही. वरून आदेश येतात त्यावर ते बोलतात. उचलली जीभ लावली टाळ्याला असा प्रकार सुरू आहे. कोण बोलतं ते महत्त्वाचं आहे. भाजपमधील काही लोक चांगले आहेत. पण दुर्देवाने ते बोलत नाहीत. पण इतरांना व्यवसाय कळत नाही. उदय सामंत हे उद्योग मंत्री आहेत. ते काय करतात? कसे करतात? माहीत आहे. आम्ही आव्हान देतो, त्यांच्यासोबत चर्चा करायला तयार आहोत. संयुक्तिक पत्रकार परिषद घ्यायला तयार आहे. त्यांनी समोर यावं आणि आकडे द्यावेत. टीका करण्यापेक्षा आमच्यासोबत पीसी घ्या. आम्ही पुराव्यासकट, आकड्यांसकट महाराष्ट्राची आर्थिक स्थिती सांगू. हे आमचं धाडस आहे. बाकीच्यांचं माहीत नाही, असं आव्हानच त्यांनी दिलं.
सरकार सुविधाच देत नाही
एका खासदाराने केंद्राच्या मंत्र्याला प्रश्न विचारला. त्यावर केंद्रीय मंत्र्याने उत्तर दिलं. त्यातून राज्यात किती कंपन्या बंद पडल्या त्याची माहिती मिळाली. केंद्रात सरकार भाजपचं आहे. नीती आयोग पंतप्रधानाच्या अंतर्गत आहे. गव्हर्नमेंट पॉलिसीत महाराष्ट्र पाच नंबरला गेला, कधीकाळी एक नंबरला होतो, असं नीती आयोगच म्हणतंय. व्यावसायिक धंदा करायला तयार आहेत. पण सरकार इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला कमी पडतं. हे मी सांगत नाही. हे नीती आयोग सांगत आहे, असा दावाही त्यांनी केला.
राजीनामा द्या, मग बोला
यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करणारे राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही टीका केली. याच विखे पाटलांना सांगायचंय तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाला. पेपर फुटला, असं मी म्हणत होतो. त्यावेळी हेच विखे म्हणत होते, रोहित पवार खोटं बोलत आहेत. रोहित पवारांवर एफआयआर दाखल करा. आता मॅटनेच भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध केलं आहे. त्यावर आधी राजीनामा द्या. त्यानंतर पवारांवर बोला, असा टोला त्यांनी लगावला.
