अखेर साहित्य संमेलन आयोजकांना उपरती; वाढत्या रोषानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा गीतामध्ये समावेश

| Updated on: Nov 11, 2021 | 8:39 PM

मराठी साहित्यात विश्वात आपल्या प्रतिभेने तळपणारे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या नावाचा साहित्य संमेलनाच्या गीतामध्ये समावेश करण्याची उपरती अखेर आयोजकांना झाली आहे. त्यासाठी संमेलन गीत पुन्हा नव्याने तयार करण्यात आले आहे.

अखेर साहित्य संमेलन आयोजकांना उपरती; वाढत्या रोषानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा गीतामध्ये समावेश
स्वातंत्र्यवीर सावरकर.
Follow us on

नाशिकः मराठी साहित्यात विश्वात आपल्या प्रतिभेने तळपणारे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या नावाचा साहित्य संमेलनाच्या गीतामध्ये समावेश करण्याची उपरती अखेर आयोजकांना झाली आहे. त्यासाठी संमेलन गीत पुन्हा नव्याने तयार करण्यात आले आहे.

नाशिकमध्ये होणारे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या ना त्या कारणाने सतत वादात आहे. सुरुवातीला निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांची वादावादी चांगलीच रंगली. संमेलनाच्या तारखांसाठी खोटी कारणे पुढे का केली म्हणत कौतिककराव ठाले-पाटील यांनी जातेगावकरांना पत्र लिहून सुनावले होते. हा वाद शमतो ना शमतो तोच साहित्य संमेलन गीतामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नावच टाकले नसल्याचे समोर आले. गीतकार मिलिंद गांधी यांनी हे गीत रचले आहे. नाशिकचा सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वाचा इतिहास आणि आढावा या गीतातून घेतला आहे. संजय गीते यांनी हे गीत स्वरबद्ध केले आहे. या गीतामध्ये स्वातंत्र्यवीर, नाशिकचे भूमिपुत्र, साहित्यिक आणि मुंबई येथे 1938 मध्ये झालेल्या 23 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वि. दा. सावरकर यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. खरे तर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी भगूर, नाशिक येथे झाला. त्यांनी जवळपास पन्नासच्यावर पुस्तके लिहिली. त्यात 1857 चे स्वातंत्र्यसमर, संगीत उत्तरक्रिया, काळे पाणी, गांधी आणि गोंधळ, जोसेफ मॅझिनी, महाकाव्य कमला, महाकाव्य गोमांतक, माझी जन्मठेप, मोपल्यांचे बंड , शत्रूच्या शिबिरात, संन्यस्त खड्ग आणि बोधिवृक्ष, सावरकरांच्या कविता, क्ष – किरणें अशा अनेक पुस्तकांचा समावेश आहे. मात्र, असे असूनही सावरकरांच्या नावाचा उल्लेख साहित्य संमेलन गीतात उल्लेख नव्हता. विशेष म्हणजे संमेलन गीतामध्ये साम्यवादापासून ते थेट ‘भुजाभुजातील समता करते स्वागत शब्दप्रभूंचे’ असा उल्लेख होता. नाशिकमधील इतर सर्वच साहित्यिकांचा नावासह उल्लेख होता. मात्र, सावरकरांच्या नावाचा उल्लेख जाणूनबुजून टाळल्याची चर्चा होती. त्यावरून सावकरप्रेमी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली होती. अखेर वाढता रोष पाहता संमेलन गीतामध्ये सावरकरांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे संमेलन गीताच्या एका ओळीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार साहित्य संमेलन गीतातील नवे कडवे असे आहे…

रामकथेचा पट उलगडला इथल्या मातीवरती
ज्ञानाने सोपान गाठता मुक्त होय निवृत्ती
गडकिल्ले हे शिवरायांना सदैव वंदन करती
स्वातंत्र्य सूर्य सावरकर उजळे अनंत क्षितीजावरती

याबाबत गीतकार मिलिंद गांधी यांच्याशी टीव्ही 9 मराठीने संवाद साधला असता ते म्हणाले की, ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख पूर्वीही संमेलन गीतामध्ये होता. मात्र, तो स्वातंत्र्य सूर्य असा केला होता. त्यावर काही जणांनी नाराजी दर्शवली. त्यामुळे त्यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. त्यांचा उल्लेख टाळायचा वगैरे काहीही हेतू नव्हता.’

सावरकरवाद्यांच्या एकतेमुळे साहित्य महामंडळ आणि आयोजकांना जराशी जाग आली आहे. सावरकरांचा नामोल्लेख गीतात करण्यात आला आहे. आता साहित्य संमेलनात सावरकरांच्या नावे एखादे व्यासपीठ उभारावे किंवा एखाद्या सत्राला सावरकरांचे नाव द्यावे, अशी आमची मागणी आहे.
– पार्थ बावस्कर, सावरकरप्रेमी आणि अभ्यासक

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा साहित्य संमेलन गीतामध्ये पूर्वीही उल्लेख होता. मात्र, त्यासाठी स्वातंत्र्य सूर्य असा शब्द वापरला होता. आता त्यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख केला असून, लवकरच नवे गीत आपल्या समोर येईल. त्यामुळे साऱ्यांची नाराजी दूर होईल. हे संमेलनही सुरळीत पार पडेल यात शंका नाही.
– मिलिंद गांधी, गीतकार

(Swatantryaveer Savarkar’s name is finally included in the All India Marathi Sahitya Sammelan Gita to be held in Nashik)

इतर बातम्याः

कंगनाला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्या; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी, थेट राष्ट्रपतींना लिहिले पत्र

प्रख्यात हार्मोनियम वादक पंडित प्रभाकर दसककर यांचे नाशिकमध्ये निधन