TET पेपर फुटताच सरकारचा तडकाफडकी मोठा निर्णय, आता परीक्षा…नेमकं काय पाऊल उचललं?

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार, दि. 28 जून 2026 रोजी राज्यभरातील 1028 केंद्रांवर आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 2026 पुढे ढकलण्यात आली असल्याचे परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे.

TET पेपर फुटताच सरकारचा तडकाफडकी मोठा निर्णय, आता परीक्षा...नेमकं काय पाऊल उचललं?
TET Exam Postponed
Image Credit source: Google
| Updated on: Jun 27, 2026 | 2:51 PM

मुंबई, दि. 27 : टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार, दि. 28 जून 2026 रोजी राज्यभरातील 1028 केंद्रांवर आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 2026 पुढे ढकलण्यात आली असल्याचे परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे. परीक्षा पारदर्शक होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

भिवंडीत प्रश्नपत्रिकेबाबत माहिती असल्याा संशय

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत टीईटी परीक्षा सुरक्षित व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तथापि, दि. 27 जून 2026 रोजी पहाटे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भिवंडी येथे काही व्यक्तींना टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत माहिती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार भिवंडी पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकून तपासणी केली.

समान प्रश्न आढळले

या प्रकरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी बोलावून पडताळणी करण्यात आली. तपासादरम्यान संबंधित व्यक्तींकडे आढळलेल्या काही प्रश्न आणि शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) जून 2026 च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न समान असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परीक्षा पुढे ढकलली

या घटनेची गंभीर दखल घेत परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडावी, तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याने दि. 28 जून 2026 रोजी नियोजित टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आला आहे. टीईटी परीक्षेच्या नव्या तारखेसह इतर अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे परिषदेकडून कळविण्यात आले आहे.

पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही

टीईटी पेपरफुटीच्या प्रकरणावर बोलताना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी म्हटले की, ‘पेपरफुटी नंतर एकाही विद्यार्थ्यांचे शुल्क घेतलं जाणार नाही, पुनर्परीक्षेसाठी पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. तिघांवरती गुन्हा दाखल आहे पुढील तपास पोलीस करत आहेत. लवकर परीक्षा कधी होणार आहे याचं नियोजन लवकर कळवू. सर्व प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चौकशीअंती दोषींवर कारवाई केली जाईल. ज्या उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं, अशा उमेदवारांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता असणार नाही. यामध्ये उमेदवारांचा दोष नाही. पुन्हा रजिस्ट्रेशन फी आकारणार नाही.

Follow Us