कलाकार हे एकेकाळी भाई लोकांच्या इशाऱ्यावर चालायचे, केंद्र सरकारने भाईगिरी कधीपासून सुरु केली? : नाना पटोले

| Updated on: Feb 07, 2021 | 11:06 PM

शेतकरी आंदोलनावरुन देशातील अनेक कलाकारांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे. याच मुद्द्यावरुन नाना पटोले यांनी टीका केली (Nana Patole slams Modi government).

कलाकार हे एकेकाळी भाई लोकांच्या इशाऱ्यावर चालायचे, केंद्र सरकारने भाईगिरी कधीपासून सुरु केली? : नाना पटोले
Follow us on

कल्याण (ठाणे) : “कलाकार हे एकेकाळी भाई लोकांच्या इशाऱ्यावर चालायचे. केंद्र सरकारच्या दबावाखाली त्यांनी ट्विट केले आहे. केंद्र सरकारने भाईगिरी कधीपासून सुरु केली? हा सवाल आता मोदी सरकारला जनता विचारत आहे. हे चुकीचे आहे”, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. शेतकरी आंदोलनावरुन देशातील अनेक कलाकारांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे. याच मुद्द्यावरुन नाना पटोले यांनी टीका केली (Nana Patole slams Modi government).

काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नाना पटोले आज पहिल्यांदा कल्याणला आले होते. नाना पटोले त्यांच्या मित्राच्या मुलाच्या लग्नानंतर त्यांच्या घरी भेट देण्यासाठी आले होते. यादरम्यान त्यांनी कल्याण पूर्वेतील पत्रिपूल परिसरात असलेल्या काँग्रेस पदाधिकारी शाकील खान यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. तसेच कल्याण पूर्वेत नगरसेवक कुणाल पाटील यांच्या नव्या हॉस्पिटलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले (Nana Patole slams Modi government).

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोकण दौऱ्यानंतर राज्यातील सत्ता बदलाची चर्चा सुरु आहे. यावर नाना पटोले यांना प्रश्न विचारला असता, “देशात बदल होणार आहे. राज्यात सत्ता बदल होणार नाही. ही सत्ता पाच वर्षे टिकणार असा आम्हाला विश्वास आहे”, असं नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, हिंदू समाज सडका झालाय, असं वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानीबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी “कोणत्याही धर्माविषयी बोलणे चुकीचे आहे. त्याने जे वक्तव्य केले ते चुकीचे वक्तव्य केले. आम्ही त्याच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे”, अशी प्रतिक्रिया दिली.

महाविकास आघाडी हे तीन चाकी सरकार आहे असे विधान अमित शहा यांनी केले होते. त्यावरदेखील नाना पटोले यांची प्रतिक्रिया दिली. “त्यांचे सरकार सहा चाकी होते. त्याचे एक एक चाक कमी व्हायला लागले आहे. त्यांच्या या विधानाचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देतील”, असं नाना पटोले म्हणाले.

“माझी लढाई जनतेसाठी आहे, सत्तेची आणि खुर्चीसाठी नाही. खुर्ची माझ्या मागे धावते, मी खुर्चीच्या मागे नाही. मी जनतेच्या मागे धावतो”, असं नाना पटोले यावेळी म्हणाले.

दरम्यान, केडीएमसी महापालिकेत महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढेल का? असा सवाल विचारला असता, “आम्ही सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्याच माध्यमातून लढवायचं ठरवले आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे मत आणि सूचना घेतले जाईल. स्थानिक कार्यकर्ते ज्या काही सूचना करतील त्यानुसार आम्ही वेळेवर निर्णय घेऊ”, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

हेही वाचा : … तर मंत्रालयात घुसून मंत्र्यांचे कपडे काढणार, छावा संघटनेच्या जावळेंचा ठाकरे सरकारला इशारा