कल्याण-डोंबिवलीत भाजप-शिंदे गटात पुन्हा धुसफूस, आमदाराचं स्पष्ट वक्तव्य, नेमकं काय घडतंय?

| Updated on: Sep 12, 2023 | 9:40 PM

कल्याण डोंबिवलीत सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये सारं काही आलबेल नाही, असंच चित्र दिसत आहे. कारण भाजपच्या गोटात सध्या महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया वेगळं काहीतरी खुणावत असल्याची चर्चा आहे.

कल्याण-डोंबिवलीत भाजप-शिंदे गटात पुन्हा धुसफूस, आमदाराचं स्पष्ट वक्तव्य, नेमकं काय घडतंय?
Follow us on

कल्याण | 12 सप्टेंबर 2023 : कल्याण-डोंबिवली शहरात भाजप आणि शिवसेना यांच्यात काही दिवसांपूर्वी मोठा वाद उफाळल्याची घटना ताजी असताना आता नवी बातमी समोर आलीय. कल्याण-डोंबिवलीत सातत्याने भाजप आणि शिवसेना शिंदे गटात धुसफुसीच्या घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी एका पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीवरुन भाजप नेते प्रचंड आक्रमक झाले होते. खासदार श्रीकांत शिंदे आणि शिंदे गटाला आगामी निवडणुकांमध्ये पाठिंबा द्यायचा नाही, असा ठरावच भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या बैठकीत झालेला. अखेर भाजपच्या दिग्गज नेत्यांना या वादावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी करावी लागलेली.

विशेष म्हणजे ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा भाजप आणि सत्ताधारी शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आलाय. कल्याण डोंबिवलीत भाजपचाच महापौर निवडून येईल, असं माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी म्हटलं आहे. तर कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटापुढे भाजपचं काही चालत नाही, असं मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी राजू पाटील यांच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. “शिंदे गटाकडून भाजप कार्यकर्त्यांचं खच्चीकरण केलं जातंय”, असं आमदार गणपतराव गायकवाड म्हणाले आहेत.

भाजपचे माजी उपमहापौर काय म्हणाले?

“प्रत्येक पक्ष आपापल्या परीने निवडणुकांची तयारी करत असतो. तसंच भाजपदेखील वर्षातील 365 दिवस प्रत्येक निवडणुकीसाठी तयारी करत असतो. भाजपची जी रचनात्मक संघटना आहे, बुथनुसार जी रचना यावर विशेष लक्ष देवून भाजप पक्ष काम करत असतो. आम्ही गेल्यावेळी युतीत लढलोच नव्हतो. यावेळी काय होईल ते माहिती नाही. पण आम्ही जरी युतीत लढलो नसलो तरी आमच्या पदरात जे उमेदवार असतील ते जास्तीत जास्त जिंकून आणण्याचा आमचा प्रयत्न असेल”, असं माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर म्हणाले.

“आमची जास्त संख्या असेल तर निश्चितच महापौर भाजपचा असेल. यावेळी आमचेच उमेदवार जास्त संख्येने निवडून येतील. कारण गेल्यावेळी खूप कमी मतांच्या फरकाने आमच्या बऱ्याच जागा गेल्या होत्या किंवा आपसातल्या मतभेदांमुळे आमच्या काही जागा गेल्या आहेत. यावेळेला त्या उणीवा भरुन काढून आमच्या जातीत जागा निवडून येतील असा आमचा विश्वास आहे”, अशी भूमिका मोरेश्वर भोईर यांनी मांडली.

राजू पाटील काय म्हणाले?

दुसरीकेड मोरेश्वर भोईर यांच्या भूमिकेवर मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्याला वाटत असतं आमच्या पक्षाचा नेता महत्त्वाच्या पदावर बसला पाहिजे. आमचीदेखील तिच इच्छा आहे. मनसेचा महापौर बसावा, अशी आमचीदेखील इच्छा आहे. पण केडीएमसीत भाजपचं शिंदे गटापुढे काही चालेल असं मला वाटत नाही. शिंदे गटाचं जे म्हणणं आहे तेच होणार आहे. महापौर बसवणं तर लांबची गोष्ट आहे. भाजपने तिथे आधी एक सिनियरला बसवून दाखवावा”, असं चॅलेंज राजू पाटील यांनी भाजपला दिलं.

गणपत गायकवाड काय म्हणाले?

राजू पाटील यांच्या भूमिकेचं गणपत गायकवाड यांनी समर्थन केलं. “राजू पाटील यांनी जो दावा केला ती खरी वस्तुस्थिती आहे. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याकडून महाराष्ट्रातील सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण सुरु आहे. वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. राजू पाटील जे बोलले ते सत्य आहे”, असं गणपत गायकवाड म्हणाले.