200 वर्षांपूर्वीचं धरण, रेल नीरला पाणीपुरवठा, पण रेल्वेचं जीआयपी धरण सध्या मद्यपींचा अड्डा

| Updated on: May 27, 2021 | 8:56 PM

अंबरनाथमधील रेल्वेचं जीआयपी धरण सध्या मद्यपींचा अड्डा बनलं आहे (GIP dam of the railways is currently a den of drunkards)

200 वर्षांपूर्वीचं धरण, रेल नीरला पाणीपुरवठा, पण रेल्वेचं जीआयपी धरण सध्या मद्यपींचा अड्डा
Follow us on

अंबरनाथ (ठाणे) : अंबरनाथमधील रेल्वेचं जीआयपी धरण सध्या मद्यपींचा अड्डा बनलं आहे. या धरणाची सुरक्षा रामभरोसे असल्याचं पाहायला मिळतंय. या धरणाशेजारीच मोठ्या प्रमाणात मद्यपींचा वावर असतो. मद्याच्या रिकाम्या बाटल्या, कचरा यांचा खच धरणाशेजारी पाहायला मिळतोय. अंबरनाथच्या आनंदनगर एमायडीसी भागातील काकोळे गावाशेजारी रेल्वेनं 200 वर्षांपूर्वी धरण बांधलं होतं. त्यावेळेच्या ग्रेट इंडियन पेनिन्सुलार रेल्वेच्या नावाने म्हणजेच जीआयपी या नावाने हे धरण ओळखलं जाऊ लागलं. याच धरणातून कोळशाच्या इंजिनांना लागणारं पाणी वाहून नेलं जात होतं. मात्र कोळशाची इंजिनं बंद झाल्यानंतर अनेक वर्ष हे धरण दुर्लक्षित होतं. अखेर माजी केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव हे रेल्वेमंत्री झाल्यानंतर त्यांनी या धरणाशेजारी रेल नीरचा कारखाना उभारला आणि हे धरण पुन्हा उपयोगात आलं (GIP dam of the railways is currently a den of drunkards).

धरण परिसरात मद्यपींचा मुक्तसंचार

मात्र हे धरण शहरापासून जवळ असल्यामुळे या धरणावर दररोज अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या भागातून शेकडो लोक येत असतात. तर मद्यपींचाही मुक्तसंचार धरणाच्या परिसरात असल्याचं पाहायला मिळतं. अनेक जण धरणात अंघोळ करण्यासाठी तसंच गाड्या धुण्यासाठी सुद्धा येत असतात. या धरणाच्या आजूबाजूला मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेला पाहायला मिळतो. तर निर्माल्य आणि अन्य कचरासुद्धा मोठ्या प्रमाणात धरणाच्या आजूबाजूला पडलेला पाहायला मिळतो.

धरणाचं पाणी रेल्वेच्या प्रकल्पातून प्रवाशांपर्यंत

पावसाळ्यात हा सगळा कचरा धरणात वाहून येतो आणि अखेर हेच पाणी रेल्वेच्या प्रकल्पातून प्रवाशांपर्यंत पोहोचवलं जातं. त्यामुळे या धरणाची सुरक्षा अतिशय महत्त्वाची आहे. मात्र असं असतानाही धरणावर रेल्वेकडून एकही सुरक्षारक्षक नेमण्यात आलेला नाही. मद्यपी बिनधास्तपणे धरणाच्या परिसरात उच्छाद घालत असून धरणाच्या आजूबाजूला तर अक्षरश: एखाद्या दारूच्या गुत्त्यासारखी परिस्थिती पाहायला मिळतेय. त्यामुळे रेल्वेने वेळीच याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

धरणाच्या सुरक्षेवर स्थानिकांचा रेल्वे प्रशासनाला सवाल

याबाबत काकोळे गावचे सरपंच नरेश गायकर यांनी सुद्धा रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र तरीही अजून सुद्धा रेल्वेकडून या धरणाच्या सुरक्षेबाबत गांभीर्याने लक्ष दिलं जात नसल्याची त्यांची तक्रार आहे. त्यामुळे एखादी अनुचित घटना घडल्यानंतरच रेल्वेला जाग येणार का? असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे (GIP dam of the railways is currently a den of drunkards).

हेही वाचा : सख्खा भाऊ पक्का वैरी, प्रॉपर्टीच्या वादातून आईला शिवीगाळ, भावाच्या डोक्यावर लोखंडी रॉड टाकून हत्या