Ambernath : अंबरनाथ पालिकेचं वाहनतळ बनलं अनधिकृत फेरीवाल्यांचं ‘गोडाऊन’?

| Updated on: Mar 16, 2022 | 9:15 PM

वास्तविक पाहता पालिका फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना पालिकेच्याच वास्तूत फेरीवाले सामान ठेवत असल्यानं पालिकेच्याच अधिकाऱ्यांचा फेरीवाल्यांना वरदहस्त आहे का? आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना ही बाब माहीत कशी नाही? असा प्रश्न यानंतर उपस्थित झाला आहे.

Ambernath : अंबरनाथ पालिकेचं वाहनतळ बनलं अनधिकृत फेरीवाल्यांचं गोडाऊन?
अंबरनाथ पालिका वाहनतळ
Follow us on

अंबरनाथ : अंबरनाथ शहरात एकीकडे पालिकेकडून फेरीवाल्यांवर कारवाईचा दिखावा सुरू असताना दुसरीकडे हे फेरीवाले (Peddlers) पालिकेच्याच वास्तूत आपलं सामान ठेवत असल्याचं समोर आलंय. यानंतर हे सामान जप्त करणार असल्याची भूमिका पालिका प्रशासनाने घेतली आहे. अंबरनाथ शहराच्या पूर्व भागात रेल्वे स्थानकाबाहेर छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. या चौकातच फेरीवाल्यांनी बस्तान मांडलं आहे. चौकात अंबरनाथ पालिके (Ambernath Municipality)चं वाहनतळ असून तिथे कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी म्हणून एक खोली दिली आहे. मात्र या खोलीत फेरीवाले त्यांचं सामान ठेवत असल्याचं समोर आलंय. यामध्ये गॅस सिलेंडर, शेगड्या, भाजीपाला, फुलं यांचा समावेश आहे. (Luggage of unauthorized peddlers in the parking lot of Ambernath Municipality)

नुकतीच फेरीवाल्यांच्या प्रश्नावर शिवसेनेनं बैठक घेतली होती

वास्तविक पाहता पालिका फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना पालिकेच्याच वास्तूत फेरीवाले सामान ठेवत असल्यानं पालिकेच्याच अधिकाऱ्यांचा फेरीवाल्यांना वरदहस्त आहे का? आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना ही बाब माहीत कशी नाही? असा प्रश्न यानंतर उपस्थित झाला आहे. या सगळ्याबाबत अंबरनाथ पालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. धीरज चव्हाण यांना विचारलं असता, ही बाब आमच्या आताच लक्षात आली असून आता या खोलीतील सामान जप्त करून ही खोली बंद करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. अंबरनाथ शहरात फेरीवाल्यांच्या प्रश्नावर नुकतीच शिवसेनेनं पालिकेत बैठक घेऊन अधिकाऱ्यांवर आगपाखड केली होती. मात्र आता खुद्द पालिकेच्याच वास्तूत असलेल्या वाहनतळात फेरीवाल्यांचं गोदाम निघाल्यानं पालिकेच्या अधिकाऱ्यांची मात्र नाचक्की झाली आहे.

अंबरनाथ पालिकेकडून मालमत्ता कराची 70 टक्के वसुली

अंबरनाथ पालिकेनं यंदाच्या वर्षी मालमत्ता कराची 70 टक्के वसुली केली आहे. आर्थिक वर्षाअखेर म्हणजेच 31 मार्चपर्यंत 90 टक्के कर वसुली करण्याचं पालिकेचं उद्दिष्ट असणार आहे. अंबरनाथ शहरात दरवर्षी एकूण 42 कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा होणं अपेक्षित असतं. यामध्ये रहिवासी आणि औद्योगिक अशा दोन्ही मालमत्तांचा समावेश आहे. यामध्ये यंदाच्या आर्थिक वर्षात आतापर्यंत 29 कोटी रुपयांची, म्हणजेच 70 टक्के कर वसुली करण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत नागरिकांना कर भरता येणार असून तोपर्यंत 90 टक्के कर वसुलीचं उद्दिष्ट नगरपालिकेने ठेवलं आहे. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी पालिकेनं अनेक नव्या मालमत्तांना कर लावला असून त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत अतिरिक्त 2 कोटी रुपयांची भर पडणार आहे. (Luggage of unauthorized peddlers in the parking lot of Ambernath Municipality)

इतर बातम्या

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात लाथाबुक्क्यांनी मारून लिव्ह इन पार्टनरकडून महिलेची हत्या

कल्याणमध्ये कॉन्ट्रॅक्टर हल्ला प्रकरण, व्यवसायिक वादातून दिली सुपारी, सहा आरोपी ताब्यात