
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरणावरुन दावे -प्रतिदावे केले जात आहेत. या दरम्यान, उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शनिवारी शपथ देखील घेतली. आता शरद पवार गटाच्या नेत्यांकडून दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे विलीनीकरण करण्याचे ठरले होते आणि अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे ते होऊ शकले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचा इन्कार केला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला भाजपाने ग्रीन सिग्नल दिल्याचा दावा शरद पवार गटाच्या बड्या नेत्याने केला होता अशी माहिती सूत्रांनी तारखेसह दिल्याने खळबळ उडाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या असा दावा शरद पवार यांच्या गटाने केला आहे. अजितदादांच्या सोबत झालेल्या बैठकीचा व्हिडीओ देखील शरद पवार गटाने जारी केला आहे. या बैठकीला अजितदादा व्यतिरिक्त त्यांच्या पक्षाचा अन्य कोणी नेता हजर नसल्याचे देखील उघड झाले होते. अजितदादा यांच्या अपघातासंदर्भात अनेक नेत्यांनी संयश व्यक्त करीत या अपघाताची न्यायालयीन चौकशीची मागणी देखील केली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दादा माझ्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करायचे. परंतू याबद्दल त्यांनी कधीही विषय काढला नसल्याचे सांगत भविष्यात देखील दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र यायचे असेल तर आम्हाला आधी सांगावे लागेल अशी अटही घातली आहे. यातच आता शरद पवार यांच्या पक्षातील नेत्याने एक बडा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहेत.अजितदादा यांच्या पश्चात त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शनिवारी शपथ घेतली आणि त्यानंतर त्या आता कामाला लागल्या आहेत. शरद पवार यांनी या शपथविधी संदर्भात आपल्याला काही कल्पना नव्हती असे सांगून खळबळ उडवून दिली होती. दुसरीकडे दोन्ही पक्ष एकत्र येणार होते असा दावा शरद पवार यांनी केला होता. दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र करण्याच्या संदर्भात अजितदादा आग्रही होते.
आपले काका शरद पवार यांच्या समोरच राष्ट्रवादी पक्ष फुटल्याने त्यांच्या हयातीत हे दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची तीव्र इच्छा होती असे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले होते. या संदर्भात अनेकदा बैठका झाल्या होत्या. मात्र राज्यातील स्थानिय स्वराज्य संस्थांच्या निवडणूका विविध टप्पे लागोपाठ जाहीर झाल्याने दोन्ही पक्षांना मर्जर करण्यास संधीच मिळाली नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. मात्र, दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर शरद पवार एनडीएत सामील होणार का यावर मात्र जयंत पाटील यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे दावे जरी फेटाळून लावले जात असले तरी या विलीनीकरणासंदर्भातील कल्पना ऑक्टोबर २०२४ मध्ये भाजपाला देण्यात आली होती. तसेच १४ नोव्हेंबर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून विलीनीकरणाला ग्रीन सिग्नल मिळाला होता अशा पद्धतीचा दावा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या एका वरिष्ठ नेत्याने केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विलीनीकरणाचे दावे फेटाळून लावले जात असले तरी आता या दाव्याने या चर्चेला पुन्हा तोंड फुटले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षाचे विलीनीकरण होऊच नये यासाठी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी भाजपाच्या सांगण्यावरुन घाईघाईत उरकल्याचे म्हटले जात आहे.