ठाकरे कुटुंब केदारनाथाच्या दर्शनाला; कर्नाटक सीमावासीयांची घोषणाबाजी, बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!

Uddhav Thackeray Aditya and Rashmi Thackeray Visit Badrinath and Kedarnat : उद्धव ठाकरे कुटुंबासह केदारनाथ आणि बद्रीनाथाच्या दर्शनाला पोहोचले आहेत. तिथे कर्नाटक सीमावासीयांकडून शिवरायांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. साहेब आम्ही तुमच्यासोबत आहोत, म्हणत ठाकरेंना समर्थनही देण्यात आलं.

ठाकरे कुटुंब केदारनाथाच्या दर्शनाला; कर्नाटक सीमावासीयांची घोषणाबाजी, बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!
आयेशा सय्यद | Updated on: Nov 04, 2023 | 9:03 AM

निवृत्ती बाबर, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, बद्रीनाथ- उत्तराखंड | 04 नोव्हेंबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुबटुं उत्तराखंड दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी बद्रीनाथाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासमोर बेळगावमधल्या सीमा भागातील लोकांनी घोषणाबाजी केली. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा कर्नाटक सीमावासीयांनी केली. तसंच उद्धवसाहेब, आदित्यसाहेब तुम्ही काहीच काळजी करू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं म्हणत या सीमाभागातील रहिवाशांनी ठाकरेंना आपलं समर्थन दिलं. तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोषही यावेळी करण्यात आला. आज सकाळी उद्धव ठाकरे सहकुटुंब  केदारनाथाच्या दर्शनाला पोहोचले.

उद्धव ठाकरे कालपासून उत्तराखंड दौऱ्यावर असून त्यांच जोरदार स्वागत उत्तराखंडमध्ये करण्यात उद्धव ठाकरे यांनी काल बद्रीनाथाचं दर्शन घेतलं. यावेळी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे तसंच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, तसंच जायेंगे तो महाराष्ट्र में नहीं तो जेल में… अशा घोषणा या सीमाभागातील नागरिकांनी दिल्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी हात जोडले. तसंच शिवरायांच्या नावाचा जयघोष करण्यात आला तेव्हा उद्धव ठाकरे यांनीही या भाविकांच्या सुरात सूर मिसळले.

बद्रीनाथला दर्शनाला आलेल्या भाविकांमध्ये काही शिवसेनचे कार्यकर्ते सुद्धा होते. उद्धव ठाकरे सहकुटुंब आले हे लक्षात येताच त्यांनी ‘ठाकरेंच्या’ नावाने घोषणा द्यायला सुरुवात केली. ज्या ठिकाणी जमलेल्या काही जणांकडून ‘जय भवानी, जय शिवाजी’ जयघोष मंदिर परिसरात ऐकायला मिळाला. पूजेनंतर ठाकरे बाहेर पडल्यानंतर त्यांना ही घोषणाबाजी ऐकू आली. तेव्हा त्यांनी बद्रीनाथ दर्शनासाठी आलेल्या इतर शिवसेना कार्यकर्त्यांसोबत भाविकांसोबत फोटो काढला आणि आभार मानले.

कर्नाटक राज्याच्या स्थापनेचा दिवस म्हणजेच 1 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी बांधव काळा दिवस म्हणून पाळतात. कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील सीमाभागात आज मराठी बांधव बंद पाळून आपला निषेध नोंदवतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून सुरु झालेला हा काळा दिवस गेली अनेक वर्षे पाळला जातो. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी मागणी सीमाभागातील नागरिक करत असतात. हीच मागणी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बद्रीनाथ या ठिकाणी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us