‘कशामुळे मध्यावधी निवडणुका घेणार?’, नारायण राणे उद्धव ठाकरेंवर कडाडले

"मध्यावधी निवडणुकीसाठी युद्ध किंवा नैसर्गिक आपत्ती आलीय का? कशामुळे मध्यावधी निवडणुका घेणार?", असे सवाल नारायण राणेंनी केले.

कशामुळे मध्यावधी निवडणुका घेणार?, नारायण राणे उद्धव ठाकरेंवर कडाडले
Chetan Patil | Updated on: Nov 06, 2022 | 3:03 PM

मुंबई : राज्यातील राजकारणात कधी काय घडेल याचा काहीच भरोसा नाही. कारण गेल्या साडेतीन महिन्यांपासूनच्या घडामोडी तेच सांगत आहेत. भाजपकडून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शिवसेनेसारखी फूट पडेल, असा दावा भाजप नेत्यांकडून केला जातोय. तसेच काँग्रेस पक्षातील तब्बल 22 आमदार फुटणार असल्याचा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केल्याने खळबळ उडालीय. या सगळ्या राजकीय घडामोडींदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना राज्यात मध्यावधी निवडणुका कधी लागू शकतात. त्यामुळे मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. पण त्यांच्या याच सूचनांवरुन भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सडकून टीका केलीय.

“मध्यावधी निवडणुकीसाठी युद्ध किंवा नैसर्गिक आपत्ती आलीय का? कशामुळे मध्यावधी निवडणुका घेणार? काही कारण असलं पाहिजे ना! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कारण सांगावं की, या कारणासाठी मध्यावधी निवडणूक होईल. त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून मध्यावधी निवडणुका घेतल्या जातात का? पण तसं नाही होत. त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यावं, असं मला वाटत नाही. कारण अभ्यासू किंवा वैचारिक पद्धतीने त्यांनी सूचना दिलेली नाही. घरबसल्या बोलायला काय? त्यांनी घराच्या बाहेर येऊन बोलावं”, असा घणाघात नारायण राणेंनी केला.

राणेंची ऋतुजा लटकेंवर टीका

दरम्यान, नारायण राणेंना अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या निकालाबाबत प्रश्न विचारण्यात आला. या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास निश्चत आहे. त्यामुळे लटके यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवरही टीका केलीय. त्यांच्या या टीकेवर नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं.

“आधी जिंकून या, विजयी म्हणून शिक्कामोर्तब होऊ द्या, मग बोला. कधी काय बोलावं हे त्यांना अजून अवगत नाहीय. भाजपची मतं कुणाला पडली हे आम्ही आधी त्यांना पाठिंबा देऊन स्पष्ट केलं. आम्ही मध्येच लटकत नाहीत. आमचा निर्णय पक्का असतो. मी पोटनिवडणुकीकडे गांभीर्याने पाहिलं नाही. कारण सगळ्याच पक्षांनी लटकेंना पाठिंबा दिलेला होता”, अशी प्रतिक्रिया राणेंनी दिली.

‘अजित पवारांची नाराजी फडणवीसांना कळेल’

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील चिंतन शिबिरात काल अजित पवार गैरहजर होते. त्यामुळे ते नाराज आहेत, अशी चर्चा आहे. याबाबत नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता अजित पवारांची नाराजी मला कशी कळेल? असा उलटसवाल केला. तसेच “अजित पवारांची नाराजी त्यांच्या जवळचे आहेत, आमचे देवेंद्र फडणवीस यांना जास्त माहिती आहे. त्यांना विचारुन सांगतो”, अशी मिश्किल टीप्पणी त्यांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us