
सर्दी, खोकला झाल्यावर आराम मिळावा यासाठी घेतलं जाणाऱ्या कफ सिरपचा सध्या सगळ्यांनी धसका घेतला आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे अनेक लहान बालकांनी जीव गमावला असून त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. अनेक राज्य सरकारनी या औषधांवर बंदी घातली असून, आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सल्ल्यानंतर छत्तीसगड राज्य सरकारने देखील दोन वर्षांच्या पेक्षा कमी वयाच्या मुलांना सर्दी-पडसे यासाठी कफसिरप देण्यावर बंदी घातली आहे. कफ सिरप काळ ठरत असतानाच आता महाराष्ट्रात बनावट कफ सिरपवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये खोकल्याच्या औषधामुळेअर्थात कफ सिरपमुळे 19 बालके दगावल्यामुळे देशभरात खळबळ माजली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, FDA ने पुण्यात मोठी कारवाई करत रेडनेक्स फार्मसिटीकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उत्पादित केलेल्या खोकल्यावरील ‘रेसपिफ्रेश टी आर’ (Respifresh TR) या औषधाचा मोठा साठा जप्त केला आहे. FDA कडून नुकतीच ही मोठी कारवाई करण्यात आली.
FDA कडून कंपन्यांची आणि औषधांची तपासणी
देशभरातील विविध राज्यांमध्ये बालकांच्या मृत्यूच्या घटना समोर आलया असून कफ सिरपचे प्राशन केल्याने अनेक निरागस मुलांना जीव गमवावा लागला आहे. या घटनांनंतर राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील खोकल्यावरील औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची कसून तपासणी सुरू केली आहे. एवढंच नव्हे तर मेडिकल स्टोअर्स आणि सरकारी रुग्णालयांमधून खोकल्याच्या औषधांचे नमुने देखील तपासणीसाठी गोळा केले जात आहेत, अशी माहिती अन्न व औषध विभागाचे सह आयुक्त गिरीश हुकरे यांनी दिली. दरम्यान, मध्य प्रदेशात ज्या औषधाच्या सेवनाने बालके दगावल्याचा संशय आहे, त्या औषधाचा साठा सध्या महाराष्ट्र राज्यात उपलब्ध नाही, असेही हुकरे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान,दोन वर्षांखालील लहान मुलांना कोणत्याही प्रकारचे कफ सिरप (खोकल्याचे औषध) दिले जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळे पालकांनी आणि डॉक्टरांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे हुकरे यांनी नमूद केलं. सर्वसामान्य जनतेनेही मनाने डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय औषधे घेऊ नयेत. अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यातील तपासणी सुरु केली आहे. औषध निर्मिती कारखाने आणि उत्पादनांचे Risk-Based Inspection करण्यासाठी औषध निरीक्षकांची पथके नेमली आहेत. सध्या अन्न व औषध प्रशासनाची ही मोहीम राज्यभर सुरू असून, खोकल्याच्या औषधांच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षेवर विशेष लक्ष दिले जात आहे.