
आखाती देशांमध्ये युद्ध सुरू आहे. यामुळे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायुच्या पुरवठा साखळीत अडथळा निर्माण झाला आहे. याचा फटका संपूर्ण जगाला बसताना दिसत आहे. भारतातही इंधनाच्या किंमती वाढायला सुरुवात झाली आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंत इंधनाच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच वाहनांसाठी लागणाऱ्या CNG गॅसच्या किंमतीतही वाढ झाली आहे. मध्यपूर्वेतील या युद्धाचा फटका राज्यातील जनतेला बसताना पहायला मिळत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
नागपूरमध्ये वाहनांसाठी लागणाऱ्या एलपीजी ऑटो गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. नागपूर मध्ये ‘गो गॅस’ पंपावर वाहनात वापरल्या जाणाऱ्या LPG च्या दरात पुन्हा एकदा 5 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक ऑटो चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. चार दिवसांत एलपीजीच्या दरात प्रतिलिटर 23 रुपये वाढ झाली आहे. हा गॅस आता 80 रुपयांवर पोहोचला आहे. आम्ही कमवायचे किती? गॅस ॲाटोत किती रुपयांची टाकायची? आणि जगायचं कसं? असा प्रश्न नागपूरातील गरीब ॲाटोचालकांनी उपस्थित केला आहे. कारण सध्या एक लिटर एलपीजीचा दर 79.92 रुपयांवर पोहचला आहे. याचा सर्वाधीक फटका गरीब वाहनचालकांना बसत आहे.
युद्धाचा परिणाम रत्नागिरीतही जाणवू लागला आहे. शहरात अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सिलेंडर मिळवण्यासाठी गॅस एजन्सीच्या बाहेर लांबच लांब रांगा पहायला मिळत आहेत. तसेच काही ठिकाणी गॅस एजन्सीच्या बुकिंग नंबरची ऑनलाइन सेवा ठप्प झाल्याचेही समोर आले आहे. बुकिंग साठी नंबर डायल केल्यानंतर ग्राहकांना ओटीपी मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गॅस सिलेंडर मिळत नसल्याने ग्राहकांचे मोठे हाल होताना पहायला मिळत आहे. तसेच एक सिलेंडर खरेदी केल्यानंतर 30 दिवसांपर्यंत दुसरा सिलेंडर न देण्याच्या सूचना प्रशासनाकडून गॅस एजन्सींना देण्यात आल्या आहेत.
अमेरिका इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जळगाव जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरवर आधारित छोटे छोटे उद्योग संकटात सापडलेले असून व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा बंद झाला तर उद्योग बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. जळगावच्या एमआयडीसीतील चिक्की आणि गुळाचे लाडू बनवणाऱ्या कंपनीमध्ये दररोज 15 ते 20 व्यावसायिक सिलेंडर लागत असतात. मात्र आगामी काळात सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यास उद्योग पूर्णपणे ठप्प होण्याची भीती उद्योजकांनी व्यक्त केली आहे.