Video : लसीकरण केंद्रावर चेंगराचेंगरी! औरंगाबादच्या वाळूजमध्ये नागरिकांचे मोठे हाल

| Updated on: Jun 28, 2021 | 6:37 PM

काही ठिकाणी लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. औरंगाबादच्या वाळूज महानगरातील लसीकरण केंद्रावर आज मोठी गर्दी झाली होती. इतकंच नाही तर त्याठिकाणी चेंगराचेंगरीही झाल्याचं पाहायला मिळालं.

Video : लसीकरण केंद्रावर चेंगराचेंगरी! औरंगाबादच्या वाळूजमध्ये नागरिकांचे मोठे हाल
वाळूज लसीकरण केंद्रावर चेंगराचेंगरी
Follow us on

औरंगाबाद : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनापासून बचाव करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कोरोना लसीकरण मोहीम अधिक वेगवान करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात 21 जून पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. त्यामुळे काही ठिकाणी लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. औरंगाबादच्या वाळूज महानगरातील लसीकरण केंद्रावर आज मोठी गर्दी झाली होती. इतकंच नाही तर त्याठिकाणी चेंगराचेंगरीही झाल्याचं पाहायला मिळालं. (Large crowd at the Waluj Vaccination Center in Aurangabad)

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर एरवी ओस पडलेले लसीकरण केंद्रांवर आता मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे धक्काबुक्की ,रेटारेटी झाल्याचा प्रकार आज वाळूजमध्ये पहायला मिळाला. यात काही लोकांना किरकोळ इजा सुद्धा झाली. या लसीकरण केंद्रावर पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. मात्र पोलिसांनाही इथली गर्दी हाताळता आली नाही. वाळूज लसीकरण केंद्रावर आज नियोजनाचा मोठा अभाव पाहायला मिळाला. इथं झालेल्या गर्दीमुळे लोक लस घेण्यासाठी आले होते, पण त्यांना कोरोनाची लागण होण्याचीच शक्यता अधिक आहे, असं चित्र निर्माण झालं होतं.

लस संपल्यामुळे नागरिकांचा मनस्ताप

महत्वाची बाबत म्हणजे चेंगराचेंगरीचा प्रकार झाल्यानंतर वाळूज लसीकरण केंद्रावरील लसीचा साठा संपला. लसीचा साठा संपल्यामुळे इथे एक तासापासून अधिक काळ लसीकरण ठप्प झालं होतं. लसीसाठी टोकन दिलेले नागरिक लसीकरण केंद्रावर ताटकळत उभे असल्याचं पाहायला मिळालं. हजारोंची गर्दी झालेल्या या लसीकरण केंद्रावर फक्त 70 लसी शिल्लक होत्या. लस उपलब्ध झाल्यावर पुन्हा लसीकरण सुरु केलं जाईल अशी माहिती इथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली. लसीकरणाचं योग्य नियोजन नसल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

संबंधित बातम्या : 

‘जनतेतील अस्वस्थता दडपण्यासाठी राज्य सरकारकडून कोरोनाच्या नावाखाली सामाजिक आणीबाणी’, भाजपचा घणाघात

ठाण्यातील झोपडपट्टीत लसीकरणासाठी मोबाईल व्हॅन्स फिरवणार, घराजवळच मिळणार कोरोना लस

Large crowd at the Waluj Vaccination Center in Aurangabad