उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढवणार? संजय राऊत यांच्या विधानाने राजकारणात मोठा ट्विस्ट

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, 12 मे रोजी मतदान होणार आहे. महायुतीकडे बहुमत असल्याने त्यांना जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू असून, ते लढल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढवणार? संजय राऊत यांच्या विधानाने राजकारणात मोठा ट्विस्ट
उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढवणार ? काय म्हणाले संजय राऊत ?
Image Credit source: TV9
| Updated on: Apr 17, 2026 | 12:09 PM

राज्यसभा निवडणुकांनंतर आता विधान परिषदेचं बिगुल वाजलंय महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) करण्यात आली आहे.  विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडेल. विधान परिषदेच्या या जागांसाठी 12 मे रोजी मतदान पार पडणार आहे. सकाळी 9 ते 4 या वेलेत मतदान होईल. तर त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे. सध्याच्या विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार आहे.

या निवडणुकीला अवधी असला तरी त्या आधीच सत्तेची गणितं मांडली जात आहेत. या निवडणुकीत भाजपच्या खात्यात 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीकडे प्रत्येकी एक जागा येणार आहे. विधानसभेत महायुतीचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या जागांवर महायुतीचे वर्चस्व असेल. तसेच महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ गेल्या महिन्यात संपला. विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांचंच नाव पुढे येतं की दुसऱ्या उमेदवाराचं नाव पुढे केलं जाणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. यासंदर्भात शिवसेना ठाकरे गट काय निर्णय घेतो याकडे महाविकास आघाडीचंही लक्ष लागलं आहे.

उद्धव ठाकरे विधानस परिषदेची निवडणूक लढवणार आहेत का? असा सवाल आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराची सगळीकडे चर्चा आहे.

उद्धव ठाकरे विधानस परिषदेची निवडणूक लढवणार ?

माझ्या माहितीनुसार, मला जे समजतं त्या नुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जर पुन्हा उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकेल. आता महाविकास आघाडीकडून खासकरून शिवसेनेकडून काय भूमिका घ्यायची या संदर्भात आम्ही महाराष्ट्रात बसून 1-2 दिवसांत निर्णय घेऊ असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान उद्धव ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात नसल्यास महायुती अतिरिक्त उमेदवार देण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. त्यात विधान परिषदेची निवडणूक झाल्यास महाविकास आघाडीतील मतं फुटण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

असा असेल विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, येत्या 23 एप्रिल रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. निवडणुकीसाठी जे इच्छुक उमेदवार आहेत, त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 2 मे पर्यंत उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. तर 4 मे ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असेल. त्यानंतर 12 मे रोजी 9 जागांसाठी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल लागेल.

Follow Us