‘मुंबई टु गोवा’ रस्त्यावर पुस्तक लिहिण्याची का वाटतेय नितीन गडकरी यांना गरज ? नेमकं काय म्हणाले ?

| Updated on: Mar 30, 2023 | 2:26 PM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज रायगड येथील पनवेल ते इंदापूर ( पनवेल - कासू ) या चौपदरीकरण नॅशनल हायवेचा पायाभरणी समारंभ संपन्न झाला. त्यावेळी बोलताना गडकरी यांनी मुंबई गोवा महामार्गाबाबत मोठे भाष्य केले.

मुंबई टु गोवा रस्त्यावर पुस्तक लिहिण्याची का वाटतेय नितीन गडकरी यांना गरज ? नेमकं काय म्हणाले ?
UNION MINISTER NITIN GADKARI
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us on

पनवेल : कोकणच्या विकासासाठी महत्वाचा ठरणारा मुंबई – गोवा महामार्गाचे काम गेले अनेक वर्ष रखडले आहे. किती कंत्राटदार बदलले, भूसंपादनाच्या अडचणी निकाली काढण्यात आल्या. तरीही या रस्त्यासाठी काम रखडत सुरु आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डिसेंबर २०२३ पर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण होईल असे ठामपणे सांगितले. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा महामार्गाचे काम करताना मी थकलो असे विधान करत त्यामागचे कारणही दिले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज रायगड येथील पनवेल ते इंदापूर ( पनवेल – कासू ) या चौपदरीकरण नॅशनल हायवेचा पायाभरणी समारंभ संपन्न झाला. त्यावेळी बोलताना गडकरी यांनी मुंबई गोवा महामार्गाबाबत मोठे भाष्य केले. या रस्त्यावर सहा इंच किंवा आठ इंच व्हाईट टॉपिंग करा. सिमेंटचे काँक्रीटकरण करा. कोकणात पाऊस जास्त पडतो. त्यामुळे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या बाजूला व्यवस्था करा.

हे सुद्धा वाचा

नागपूरमध्ये सर्वच ठिकाणी सिमेंटचे काँक्रीटकरण केलेले रस्ते बनविले आहेत. यामुळे येथे खड्डे पडत नाहीत. पन्नास पन्नास वर्ष रस्त्यावर खड्डे पडत नाहीत. आता हा रस्त्याही काँक्रीट करतो आहे. हे काम आजपासून सुरू होत आहे ते लवकरच पूर्ण होईल असे ते म्हणाले. नागपूरमध्ये अनेक कॉन्ट्रेटरला कामे दिली. पण, कुणाला घरी यावे लागले नाही. त्यांना एकच सांगितले की काम चांगले केले नाहीत, क्वालिटी दिली नाही तर याद राखा.

मुंबई गोवा महामार्गाचे काम अनेक वर्ष रखडले. या रस्त्याचा काय दोष आहे हे माहित नाही. कॉन्ट्रेटरने काम केले नाही तर रगडा यांना. त्यांनी कामे घेऊन काही उपकार केले नाही. ते एवढे त्रास देतात. पण त्यांनाही त्रास देणारे एकही कमी नाहीत. कर्नाळा अभयारण्य रस्त्याचे काम किती दिवस अडकवून ठेवले. परमिशन किती दिवस अडकवून ठेवले ? 2009 साली अर्ज केला त्याला 2016 साली परवानगी दिली.

कोकणात एका घरात पाच वारसदार. त्या वारसदारांची तेरा पोरे आणि जागा दोन एकर. प्रत्येकाचे म्हणणे वेगवेगळे. सगळ्या पार्टीचे वेगळे म्हणणे. जमीन अधिग्रहणासाठी सगळे लोक दिल्लीत यायचे. कलेक्टरच्या मागे लागून लागून शेवटी अजूनही काही ठिकाणी जमीन संपादित झाली नाही. मी थकलो आता. कारण यावर इतक्या अडचणी आहेत की या कामाच्या बाबतीमध्ये कोकणाच्या रस्त्यावर पुस्तक लिहिले जाऊ शकेल. अनेक विद्वान लोक आहेत एखाद्याला प्रेरित करा. ठरवलं तर हे काम लवकर पूर्ण होईल असेही गडकरी यावेळी म्हणाले.