‘बॉम्ब घेऊन तयार राहा, आलेल्या लोकप्रतिनिधींवर हल्ला करा’, यवतमाळच्या माजी आमदाराचा अजब सल्ला
यवतमाळच्या माजी आमदाराने शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांना अजब सल्ला दिला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर कुणाकडून आक्षेप घेतला जातो का ते पाहणं आता महत्त्वाचं ठरेल.
यवतमाळ | 18 ऑगस्ट 2023 : बीआरएसचे नेते आणि माजी आमदार राजू तोडसाम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमदारांवर बॉम्ब हल्ला करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. पालकमंत्री, लोकप्रतिनिधींवर बॉम्ब हल्ले करण्यासाठी तयार रहा, असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना जाहीरपण केलं. त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी यवतमाळच्या हजारो शेतकरी, शेतमजूर यांच्या उपस्थितीत बीआरएसचे नेते माजी आमदार राजू तोडसाम यांनी मोर्चा काढला होता. या दरम्यान त्यांनी बॉम्ब हल्ला करण्याचा सल्ला उपस्थित शेतकरी आणि नागरिकांना दिला.
झालेल्या नुकसानीकडे कोणी लक्ष देत नाही. यात आपलीच चुकी असून यापुढे कोणताही लोकप्रतिनिधींवर बाॉम्ब हल्ला करा, असा सल्ला बीआरएसचे नेते तथा माजी आमदार राजू तोडसाम यांनी सभेला संबोधित करताना दिला. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता कुणाकडून आक्षेप घेतला जातो का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राजू तोडसाम नेमकं काय म्हणाले?
“शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पण मला दुर्देवाने सांगावं लागतंय, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे ना पालकमंत्र्यांनी लक्ष दिलं, ना आमदारांनी लक्ष दिलं, जिल्ह्यातील कोणताही नेता ना नदीवर, नाल्यावर, ना शेतावर आणि बांधावर गेला नाही. नेता कुठेच नाही गेला. याला आम्ही स्वत: शेतकरी, शेतमजूर, शोषित, पीडित, वंचित, बेरोजगार जबाबदार आहोत”, असं राजू तोडसाम म्हणाले.
“या जबाबदारीला जर आवाज उठवायचा असेल तर यानंतर या भागातला पालकमंत्री असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल. बॉम्ब घेऊन तयार राहा. आलेल्या लोकप्रतिनिधींवर बॉम्ब हल्ला करा. त्याच्याशिवाय ते सुधरणार नाहीत. त्याशिवाय सभागृहात बोलणार नाहीत. तसेच रस्त्यावर उतरणार नाहीत”, असा घणाघात राजू तोडसाम यांनी केला.