भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ठाकरे सरकारला दणका

| Updated on: Jan 28, 2022 | 12:08 PM

सर्वोच्च न्यायालयाने आज अत्यंत महत्त्वाचा आणि भाजपला दिलासा देणारा निर्णय दिला आहे. भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला असून ठाकरे सरकारला मोठा दणका बसला आहे.

भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ठाकरे सरकारला दणका
12 mla suspension cancelled by supreme court
Follow us on

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने ( supreme court) आज अत्यंत महत्त्वाचा आणि भाजपला दिलासा देणारा निर्णय दिला आहे. भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन (mla suspension) रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे भाजपला (bjp) मोठा दिलासा मिळाला असून ठाकरे सरकारला मोठा दणका बसला आहे. महाविकास आघाडीने एक वर्षासाठी या आमदारांचं निलंबन रद्द केलं होतं. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दोनदा सुनावणी झाली होती. आज झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. आहे. आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी भाजप आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे.

विधानसभेत गदारोळ घातल्याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन केलं होतं. या कारवाईला भाजपकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. त्यानंतर भाजपच्या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन आमच्यावर सूड भावनेने कारवाई केल्याचं म्हटलं होतं. आमच्यावर अन्याय झाल्याचंही भाजप आमदारांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं होतं. त्यानंतर राज्य सरकारच्या वकिलांनी आपली बाजू मांडताना आमदारांचं निलंबन करण्याचा अधिकार हा विधानसभेचा आहे. तो त्यांच्या कार्यकक्षेचा भाग असल्याचं म्हटलं होतं. दोन वेळा या प्रकरणावर कोर्टात सुनावणी झाली होती. त्यानंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यावर आज अखेर निर्णय आला आहे.

काय म्हणालं सुप्रीम कोर्ट?

असंवेधानिक, बेकायदेशीर अशा शब्दांवर कोर्टानं लक्ष वेधलं होतं. यावर युक्तिवाद करण्यात आला. दरम्यान, यावेळी दोन वेळा जी सुनावणी झाली, त्यावेळी 12 आमदारांचं वर्तन चुकीचं नव्हतं, असा युक्तिवाद भाजपच्या आमदारांच्या वकिलांनी केला होता. आमदारांच्या आक्रमकतेला परिस्थिती जबाबदार होती, असं त्यांनी म्हटलं होतं.

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्यानं भाजपच्या बारा आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये जुलै महिन्यात निलंबन करण्यात आलं होतं. स्वतः आशिष शेलार हे या निलंबनाच्या मागणीविरोधातील सुनावणीदरम्यान हजर झाले होते. एका वर्षसाठी निलंबन करण्यात आलं होतं.

या आमदारांचं निलंबन

ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं होतं. या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती विधानसभेत दिली होती.

विधानसभेत नेमकं काय घडलं?

अधिवेशन काळात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्र सरकारकडून मिळावा म्हणून अधिवेशनात ठराव मांडला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका मांडली. त्यानंतर भुजबळांनी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी उज्ज्वला गॅससाठी डेटा वापरला जातो. मग ओबीसींच्या आरक्षणासाठी का दिला जात नाही? असा सवाल भुजबळ यांनी केला होता. त्यावर फडणवीसांनी हरकतीचा मुद्दा मांडला होता. त्यावेळी तालिका अध्यक्षांनी फडणवीसांचा हरकतीचा मुद्दा स्वीकारला नाही. अध्यक्षांनी भुजबळांना बोलण्यास सांगितलं. त्यामुळे भाजपचे आमदार आक्रमक झाले होते.

भाजपच्या आक्रमक आमदारांनी अध्यक्षांच्या समोरी हौदात येऊन जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यानंतर एका आमदाराने अध्यक्षांचा माईक ओढला. या गदारोळात धक्काबुक्की झाली. यावेळी भाजपच्या आमदारांनी तालिका अध्यक्षांना शिवीगाळही केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे सभागृहाचं वातावरण अधिकच तापलं होतं.

संबंधित बातम्या:

TET Exam Scam : घोटाळ्यातील आकडेवारी डोळे पांढरे करणारी! बच्चू कडूंनी सांगितला घोळ दूर करण्यासाठीचा रामबाण उपाय

रोजगार मागणाऱ्या तरुणांच्या हाती वाईनची बाटली का?; व्यापारी संघाचे ज्ञानेश्वर रक्षक यांचा सवाल

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: 1 फेब्रुवारीपासून रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा पुन्हा गजबजणार