PK: बांकीपूरनंतर प्रशांत किशोर यांचं पुढील टार्गेट कोण? जेडीयु आणि आरजेडीचे धाबे दणाणले!
बिहार पोटनिवडणुकीत जन सुराज पार्टीच्या प्रशांत किशोर यांनी भाजपाच्या उमेदवाराचा दारूण पराभव केला. बांकिपूर विधानसभेची जागा भाजपाचा गड होता. मात्र प्रशांत किशोर यांनी या गडाला सुरूंग लावून दणदणीत विजय मिळवला. पण या विजयामागचं प्रशांत किशोर यांचं गणित काही वेगळंच आहे. चला सोप्या भाषेत समजून घेऊयात..

सध्या देशात कोणतीही निवडणूक असली की भाजपाचा विजय हमखास समजला जातो. त्यात हक्काची पारंपरिक जागा असेल तर मग सांगायलाच नको.. पण बिहारच्या बांकिपूर विधानसभेच्या निवडणुकीच सर्व फासे उलटे पडले आहेत. पारंपरिक विधानसभेची जागा प्रशांत किशोर यांच्या जन सूराज पार्टीने हिसकावून घेतली आहे. या जागेवर खुद्द प्रशांत किशोर यांनी निवडणूक लढवली आणि भाजपाच्या उमेदवाराला दणका दिला. या विधानसभा जागेवर भारतीय जनता पार्टीचं गेल्या 35 वर्षांपासून एकछत्री अंमल होता. मात्र निवडणुकीचे मास्टर माईंड असलेल्या प्रशांत किशोर यांनी भाजपाला दणका दिला आहे. खरं तर जन सूराज पार्टीसाठी हा विजय महत्वाचा होता. कारण नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती. पण या पोटनिवडणुकीतील विजयामुळे पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे. प्रशांत किशोर यांचं विधानसभेत एक आमदार पोहोचणं एक नवी रणनिती असणार आहे. कारण बिहार विधानसभा निवडणुकांसाठी अजून बराच अवकाश आहे.
प्रशांत किशोर यांचं पुढचं पाऊल काय?
निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी भाजपाला पोटनिवडणुकीत चेकमेट दिला आहे. विधानसभेत विरोधी गटात बसून सत्ताधाऱ्यांना जेरीस आणण्याची ताकद प्रशांत किशोर यांच्यात आहे. भले विरोधी पक्षनेतेपद आरजेडीकडे असलं तरी त्यांचा अभ्यास दांडगा आहे. त्यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य असल्याने योग्य मुद्द्यांची जाण आहे. त्यामुळे विधानसभेत सत्ताधारी भाजपाला अडचणीत आणणारे प्रश्न थेट विचारले जातील. विधानसभेत नायक चित्रपटातील हिरोसारखे प्रशांत किशोर सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवून कामाला लावतील. भाजपाने निवडणुकीत दिलेली वचनं पाळण्यासाठी त्यांच्यावर दबावतंत्राचा वापर करतील.
नितीश कुमार यांच्या पक्षातील नाराजांची प्रशांत किशोर यांना साथ!
नितीश कुमार यांच्याकडील मुख्यमंत्रिपद भाजपाकडे गेल्यापासून जेडीयू पक्षात धुसफूस आहे. उघडपणे काही नसलं तरी राजकारणात मुख्यमंत्रिपद काय असते? हे सांगायला नको. त्यात नितीश कुमार यांना मानणारा वर्ग जवळपास लालू विरोधी आहे, त्यामुळे हा वर्ग आरजेडीकडे वळला नाही. याची जाण प्रशांत किशोर यांना आहे. त्यामुळे प्रशांत किशोर नितीश कुमार यांची जागा घेण्याचा प्रयत्न करतील. विधानसभेत आपली बाजू भक्कमपणे मांडून जेडीयूला मानणाऱ्या लोकांना भावनिकरित्या जोडू शकतात.
भाजपाला मोठा धक्का!
भाजपा म्हणजे सत्ता आणि सत्ता म्हणजे भाजपा, असं समीकरण गेल्या काही वर्षात पाहायला मिळालं आहे. भाजपाने एक एक करत अनेक राज्यात सत्ता मिळवली आहे. बिहारमध्येही भाजपाची सत्ता होती. त्यामुळे पोटनिवडणूक सोपा पेपर असल्याचं भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. त्यात 25 वर्षे भाजपाने या जागेवर अधिराज्य गाजवलं आहे. त्यामुळे हा गड भेदणं सोपं नव्हतं. पण प्रशांत किशोर यांनी पोटनिवडणुकीत भाजपाच्या रणनितीची हवा काढून टाकली.