Prashant Kishor Win Election : 30 वर्षात जिथे भाजपला हरवणं कोणाला जमलं नाही, ते प्रशांत किशोर यांनी कसं शक्य केलं? भाजपच्या पराभवाची 10 कारणं
Prashant Kishor Win Election : आज तीन राज्यातील तीन विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यात निकालांमध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती बिहारच्या बांकीपूरची. इथून प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी बाजी मारली. प्रशांत किशोर यांनी अशक्य वाटणारी ही गोष्ट कशी शक्य केली? भाजपचं काय चुकलं? समजून घ्या.

तीन राज्यातील तीन विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. यात भाजपला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला. या पोटनिवडणुकांमध्ये बिहारचा पराभव भाजपसाठी सर्वात जास्त धक्कादायक आहे. बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी बाजी मारली. भाजपच्या नीरज सिन्हा यांचा पराभव झाला. मध्य प्रदेशच्या दतियामध्ये काँग्रेसच्या घनश्याम सिंह यांनी भाजपच्या आशुतोष तिवारी यांना हरवलं. फक्त गुजरातमधून भाजपला दिलासा मिळाला. मांजलपूरच्या जागेवर भाजपच्या सतेन्द्रभाई पटेल यांनी काँग्रेसच्या भिखाभाई रबारी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. आज निकालाच्या स्कोरबोर्डवर भाजप एक, काँग्रेस एक आणि जनसुराज एक अशी नोंद झाली.
तसं पहायला गेलं तर या निकालांनी सरकारच्या स्थिरतेवर काही परिणाम होणार नाहीय. पण या निकालांमध्ये एक मोठा संदेश दडलेला आहे. त्याचे परिणामी दूरगामी होऊ शकतात. बांकीपूरमधील भाजपच्या पराभवाची सर्वाधिक चर्चा आहे. याच बांकीपूरमधून काही महिन्यांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी 50 हजारपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला होता. विशेष बाब म्हणजे बांकीपूरची जागा भाजपने 1995 पासून एकदाही गमावलेली नाही. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. इथे झालेल्या भाजपच्या पराभवाची सर्वाधिक चर्चा यासाठी होणार कारण जनसुराज्यचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी हा पराभव केलाय. या विजयामुळे प्रशांत किशोर पहिल्यांदा विधानसभेत जाणार आहेत.
हा विजय अनेकांचे भ्रम मोडणारा
प्रशांत किशोर यांनी आपल्या निवडणूक रणनितीने अनेकाना विधानसभेत पोहोचवलं. पण आता ते स्वत: तिथे जाणार आहेत. महत्वाचं म्हणजे प्रशांत किशोर यांचा हा विजय अनेकांचे भ्रम मोडणारा आहे. ज्यांना असं वाटत होतं की, बांकीपूरमधून भाजपने कोणालाही तिकिट दिलं तरी त्यांचा उमेदवार डोळेझाकून निवडून येईल तो भाजपचा भ्रम आज मोडला. मतदारांनी मतपेटीतून हा संदेश देऊ भाजपचा विश्वास मोडला. ज्या जागेवर नितीन नवीन यांनी 50 हजारपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला होता. त्याच जागेवर प्रशांत किशोर यांनी भाजप उमेदवाराचा 19 हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. अगदी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी प्रशांत किशोर यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली.
भाजपच्या या पराभवाची कारणं काय?
सर्वात जास्त अतिआत्मविश्वास या पराभवाचं मुख्य कारण आहे.
NEET विद्यार्थी आंदोलनाचा परिणाम दिसून आला.
UGC मुद्यावर नाराजीचा भाजपला फटका बसला.
भरत तिवारी प्रकरणामुळे कोर वोटर नाराज झाले.
सम्राट चौधरी विरोधात तयार झालेल्या वातावरणाचा परिणाम दिसला.
प्रशांत किशोर यांची प्रतिमा आणि त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना जनसमर्थन मिळालं.
काँग्रेस आणि आरजेडीची मतं प्रशांत किशोर यांच्याकडे वळली.
निवडणुकीत जातीय समीकरणांऐवजी मुद्दे आणि उमेदवाराला प्राथमिकता मिळाली.
भाजपने योग्य उमेदवार निवडला नाही, त्याचा फटका बसला.
बांकीपुरमध्ये प्रशांत किशोर यांच्या नावाचा प्रभाव भाजपने लक्षात घेतला नाही.
