भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्याच जागेवर पराभव; प्रशांत किशोर विजयी
Bankipur Bypoll Result : बांकीपूर पोटनिवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी 18953 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या जागेवरील भाजपच्या पराभवाची कारणे समोर आली आहेत.

बिहारमधून भाजपची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. बांकीपूर पोटनिवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी 18953 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेद्वार नीरज सिन्हा यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच आरजेचीचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर घसरला. या पराभवामुळे भाजपला 30 वर्षांपासून ताब्यात असलेला गड सोडावा लागला आहे. दिल्लीतील आंदोलनानंतर हा भाजपला Gen Z चा पहिला मोठा दणका मानला जात आहे. भाजपच्या या पराभवाची कारणे सविस्तर जाणून घेऊयात.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे राज्यसभेवर गेल्याने बांकीपूरची जागा रिक्त झाली होती. गेल्या 30 वर्षांपासून या जागेवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवलेला होता. मात्र आता भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे प्रशांत किशोर यांनी भाजपला त्यांच्या गडातच पराभूत केले. या निवडणुकीत बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि बिहारमधील संपूर्ण मंत्रिमंडळाने बांकीपूरमध्ये प्रचार केला, मात्र तरीही पक्षाला पराभव स्वीकारावा लागला आहे.
बांकीपूरमध्ये भाजपच्या पराभवाची प्रमुख कारणे
- मतदारसंघात भाजपविरोधी वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.
- भाजपचा अतिआत्मविश्वास पराभवाचे एक प्रमुख कारण ठरल्याचे मानले जात आहे.
- NEET पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा निकालावर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. म्हणजेच Gen Z जनरेशनने भाजप विरोधात मतदान केले.
- UGC संदर्भातील मुद्द्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती, त्याचाही परिणाम मतदानावर दिसून आला.
- भरत तिवारी एन्काऊंटर प्रकरणामुळे राज्य सरकारविरोधात नाराजी निर्माण झाली.
- अलीकडच्या काळात मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत होते, तसेच राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबतही जनतेत असंतोष होता.
- प्रशांत किशोर यांनी शिक्षण, रोजगार आणि विकास या मुद्द्यांवर भर दिल्याने मतदारांचा प्रतिसाद मिळाला.
- विरोधी पक्षांकडून प्रभावी लढत न झाल्याने त्यांची मते मोठ्या प्रमाणात प्रशांत किशोर यांच्या बाजूने वळल्याचे मानले जात आहे. विशेषतः मुस्लिम आणि यादव मतदारांचा पाठिंबा त्यांना मिळाला.
- या निवडणुकीत जातीय समीकरणांपेक्षा विकासाच्या मुद्द्यांना मतदारांनी प्राधान्य दिले.
- भाजपने उमेदवार निवडताना गोंधळ घातल्याची टीका झाली. सुरुवातीला उमेदवार बदलण्यात आला आणि अखेरीस तुलनेने कमी प्रभावी उमेदवार मैदानात उतरवण्यात आला. या सर्व कारणांमुळे भाजपचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे.
