कोरोनाशी लढण्यासाठी योग्य धोरण हवं, ‘निरर्थक बात’ नको; राहुल गांधींची टीका

| Updated on: May 30, 2021 | 3:11 PM

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात'वर निशाणा साधला आहे. कोरोनाशी लढायचं असेल तर योग्य धोरण हवं. (Can't Fight Covid With "Meaningless" Talk: Rahul Gandhi)

कोरोनाशी लढण्यासाठी योग्य धोरण हवं, निरर्थक बात नको; राहुल गांधींची टीका
राहुल गांधी, काँग्रेस नेते
Follow us on

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’वर निशाणा साधला आहे. कोरोनाशी लढायचं असेल तर योग्य धोरण हवं. महिन्यातून एकदा होणाऱ्या ‘निरर्थक बात’ची गरज नाही, अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे. (Can’t Fight Covid With “Meaningless” Talk: Rahul Gandhi)

राहुल गांधी यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. कोरोनाशी लढायचं असेल तर चांगली नियत, धोरण आणि निश्चय हवा. महिन्यातून एकदा ‘निरर्थक बात’ करण्याची गरज नाही, असं ट्विट राहुल यांनी केलं आहे. आज मोदींनी ‘मन की बात’मधून देशातील जनतेशी संवाद साधला. त्यावरून राहुल गांधी यांनी टीका केली आहे. कालही राहुल यांनी मोदींवर टीका केली होती. मोदींची खोटी प्रतिमा तयार करण्यासाठी त्यांच्या खात्यातील कोणताही मंत्री कोणत्याही विषयावर बोलत असतो. ती त्यांची मजबुरी आहे, अशी टीका राहुल यांनी केली होती.

जावडेकरांचा पलटवार

त्याआधी शुक्रवारी राहुल यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर टीका केली होती. देशात ज्या पद्धतीने लसीकरण सुरू आहे. ते पाहता लसीकरणासाठी तीन वर्ष लागतील, असं सांगतानाच पंतप्रधानांच्या नौटंकीमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे, अशी टीका त्यांनी केली होती. त्याला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या जनतेला सोबत घेऊन कोरोनाशी लढा देत आहेत. अशावेळी पंतप्रधानांच्या या प्रयत्नांना नौटंकी संबोधून खिल्ली उडवणं योग्य नाही. हा देश आणि जनतेचा अपमान आहे. आम्ही अशा शब्दांचा कधीच वापर करणार नाही. कारण जनतेने राहुल यांची नौटंकी कधीच बंद केली आहे, असा पलटवार जावडेकर यांनी केला होता.

मोदींचा संवाद

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातमधून देशातील जनतेशी संवाद साधला. गेल्या सात वर्षात जे काही आपण कमावलं आहे. ती देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या मेहनतीची देण आहे. या सात वर्षात आपण राष्ट्र गौरवाचे हे क्षण एकत्र मिळून अनुभवले आहेत. आपण आपल्याच विचाराने पुढे जात आहोत. कुणाच्याही दबावात नाही. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर आपण तडजोड करत नाही. जेव्हा आपल्या लष्कराची ताकद वाढते. तेव्हा आपण योग्य मार्गाने जात आहोत, असं वाटतं, असं मोदी म्हणाले. तसेच, आता आपला देश दुसऱ्या देशांच्या विचारांवर चालत नाही. कुणाच्याही दबावात नाही. आपण आपलेच संकल्प घेऊन पुढे जात आहोत. आता भारत आपल्याविरोधात षडयंत्र करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देत आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढला आहे. हे पाहून अभिमानही वाटत आहे, असंही ते त्यांनी सांगितलं. (Can’t Fight Covid With “Meaningless” Talk: Rahul Gandhi)

 

संबंधित बातम्या:

आता आपला देश षडयंत्र करणाऱ्यांना जशास तसा तसे उत्तर देतोय; मोदींची ‘मन की बात’

अजूनही नेहरुंच्याच पुण्याईवर देश चाललाय; संजय राऊतांचा भाजपला टोला

अजितदादा सांभाळून बोला, मी फाटक्या तोंडाचा आहे, बोलायला लागलो तर महागात पडेल: चंद्रकांत पाटील

(Can’t Fight Covid With “Meaningless” Talk: Rahul Gandhi)