पहिले दारु पाजली, नंतर नको त्या प्रकारे… केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला POCSO कायद्यांतर्गत अटक
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला POCSO कायद्यांतर्गत पोलिसांनी अटक केली आहे. एका अल्पवयीन मुलीने तक्रार केल्यानंतर ही अटक करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात गुन्हेगारी वाढत चालली आहे. अनेक महिलांवार अत्याचार होत असल्याच्या घटना सतत समोर येत आहेत. दरम्यान एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे. एका 17 वर्षीय तुरुणाने मंत्र्याच्या मुलावर जबरदस्ती दारु पाजून चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. आता हे केंद्रीय मंत्री कोण आहेत? नेमकं प्रकरण काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जाणून घ्या त्याविषयी…
केंद्रीय मंत्री बंडी संजय कुमार यांचे पुत्र बंडी भगीरथ यांना शनिवारी (१६ मे) तेलंगणा पोलिसांनी ‘पॉक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत अधिकृतपणे अटक केली आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाने या प्रकरणात भगीरथ यांना कोणताही अंतरिम दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला होता, ज्याच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी ही कारवाई केली. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने ८ मे रोजी नोंदवलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्याच्या आधारे भगीरथविरुद्ध ‘लुकआउट सर्कुलर’ देखील जारी करण्यात आले होते. एफआयआरमधील (FIR) आरोपानुसार, भगीरथचे त्या मुलीसोबत संबंध होते आणि त्याने तिचे लैंगिक शोषण केले. याशिवाय मुलीने त्याच्यावर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आणि जबरदस्तीने दारू पाजल्याचा गंभीर आरोपही केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि ‘पॉक्सो’ कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.
मुलाने देखील केली तक्रार
दुसरीकडे, आरोपी बंडी भगीरथ याने या आरोपांना आव्हान देत पोलिसात एक प्रति-तक्रार (Counter Complaint) दाखल केली आहे. त्याच्या दाव्यानुसार, ती मुलगी त्याला स्वतःहून तिच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये आणि पार्ट्यांमध्ये आमंत्रित करायची. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आणि त्याच्याकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली.
केंद्रीय मंत्री बंडी संजय कुमार यांनी केली पोस्ट
दरम्यान, या अटकेपूर्वी केंद्रीय मंत्री बंडी संजय कुमार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली होती की, कायदा आणि न्यायव्यवस्थेचा मान राखत त्यांनी स्वतःहून मुलाला वकिलांच्या माध्यमातून पोलिसांसमोर हजर केले आहे. भगीरथने काहीही चुकीचे केले नसल्याचे भक्कम पुरावे वकिलांना दाखवले होते आणि हा खटला कोर्टात फेटाळला जाऊन जामीन मिळेल अशी आशा असल्याने शरण येण्यास थोडा उशीर झाला, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मात्र, पोलिसांनी हा दावा फेटाळत ही अधिकृत अटक असल्याचे सांगितले आहे.
सध्या या प्रकरणावरून तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने आणि विरोध प्रदर्शन झाले असून आता या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) च्या नेत्या के. कविता यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. या कथित पॉक्सो प्रकरणात निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी व्हावी, यासाठी केंद्रीय मंत्री बंडी संजय कुमार यांना त्यांच्या मंत्रिपदावरून तात्काळ हटवण्यात यावे, अशी मागणी कविता यांनी या पत्राद्वारे पंतप्रधानांकडे केली आहे.