काँग्रेसने शब्द पाळला…! कर्नाटकात पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘या’ अश्वासनांची पूर्तता….

| Updated on: May 21, 2023 | 12:07 AM

कर्नाटकातील प्रत्येक महिला कुटुंबप्रमुखाला दरमहा 2 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अण्णा भाग्य योजना लागू करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत.

काँग्रेसने शब्द पाळला...! कर्नाटकात पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अश्वासनांची पूर्तता....
Follow us on

बेंगळुरू : कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सिद्धरामय्या आता अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी आपल्या पक्षाच्या पाच हमीपत्रांची पूर्तता करण्याचे तत्वत: मान्यता दिली आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक 50,000 कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला आहे. तर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी शनिवारी एका व्हिडिओ संदेशाद्वारे काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवल्याबद्दल कर्नाटकातील जनतेचे त्यांनी आभारही मानले आहेत.

कर्नाटकात ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल कर्नाटकातील जनतेचे आभार मानत त्यांनी सांगितले की, फुटीरतावादी आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना जनतेने नाकारले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

त्यामुळे आता काँग्रेसकडून देण्यात आलेली आश्वासनं पूर्ण करणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी दिला आहे. तसेच काँग्रेस कर्नाटकासाठी वचनबद्ध असून नवीन राज्य सरकार विकासाच्या वाटेवर काम करणार असल्याचे अश्वासनही त्यांनी यावेळी दिले आहे.

तर राहुल गांधी यांनी ट्विट करुन सांगितले आहे की, त्यांच्याकडून जे काही बोलले जाते ते पूर्ण केले जाते. पहिल्याच दिवशी पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी कर्नाटकला दिलेल्या 5 अश्वासनांची पूर्तता करण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर गृह लक्ष्मी योजना लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत.

तर या योजनेद्वारे कर्नाटकातील प्रत्येक महिला कुटुंबप्रमुखाला दरमहा 2 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अण्णा भाग्य योजना लागू करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत. ज्याद्वारे बीपीएल कुटुंबांना प्रति व्यक्ती प्रति महिना 10 किलो तांदूळ मोफत दिला जाणार आहे.

काँग्रेसने वचन दिलेल्या पाच अश्वासनांमध्ये सर्व घरांना 200 युनिट मोफत वीज (गृह ज्योती), प्रत्येक घरातील महिला प्रमुखाला 2 हजार रुपये मासिक मदत (गृहलक्ष्मी), बीपीएल कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 10 किलो तांदूळ मोफत ( अण्णा भाग्य ), बेरोजगार पदवीधर तरुणांना दरमहा रु. 3 हजार, बेरोजगार पदविकाधारकांना (युवानिधी) दोन वर्षांसाठी प्रति महिना रु. 1,500 आणि सार्वजनिक वाहतूक बसमध्ये महिलांसाठी मोफत प्रवास (शक्ती).

अशा अश्वासनांची पूर्तता करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या आश्वासनांमुळे निवडणूक प्रचारादरम्यान त्याचा मोठा फायदा झाल्याचेही राजकीय विश्लेषकांनी सांगितले.

यावेळी काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे की, पक्षाच्या विजयात विशेषत: महिलांचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.