Prashant Kishor: काँग्रेसने महाराष्ट्रात शिवसेनेसोबत आघाडी ठेवावी की ठेवू नये?; प्रशांत किशोर यांचा काँग्रेस हायकमांडला सल्ला काय?

| Updated on: Apr 19, 2022 | 6:41 PM

Prashant Kishor: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर काँग्रेस खडबडून जागी झाली आहे. त्यामुळे काँग्रेस येणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागली आहे.

Prashant Kishor: काँग्रेसने महाराष्ट्रात शिवसेनेसोबत आघाडी ठेवावी की ठेवू नये?; प्रशांत किशोर यांचा काँग्रेस हायकमांडला सल्ला काय?
काँग्रेसने महाराष्ट्रात शिवसेनेसोबत आघाडी ठेवावी की ठेवू नये?; प्रशांत किशोर यांचा काँग्रेस हायकमांडला सल्ला काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर काँग्रेस (congress) खडबडून जागी झाली आहे. त्यामुळे काँग्रेस येणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागली आहे. या कामासाठी त्यांनी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (prashant kishor) यांच्याशी सल्लामसलत केली आहे. प्रशांत किशोर यांनी यावेळी काँग्रसला विजयाचा रोडमॅप दिला आहे. प्रत्येक राज्याच्या राजकीय परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा सल्ला प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला दिला आहे. महाराष्ट्राबाबतही त्यांनी काँग्रेसला सल्ला दिला आहे. ज्या ज्या राज्यात प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत. त्या राज्यात काँग्रेसने प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी करावी. महाराष्ट्रातही प्रादेशिक पक्ष मजबूत असल्याने या पक्षांसोबत आघाडी करण्याचा सल्ला प्रशांत किशोर यांनी दिला आहे. म्हणजेच प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला शिवसेना (shivsena) आणि राष्ट्रवादीसोबतची आघाडी कायम ठेवण्याचा अप्रत्यक्ष सल्लाच दिला आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी एका बैठकीचं आयोजन केलं होतं. वरिष्ठ काँग्रेस नेते या बैठकीला हजर होते. प्रशांत किशोर यांनाही या बैठकीला पाचारण करण्यात आलं होतं. यावेळी प्रशांत किशोर यांना काँग्रेसला विजयाचा रोडमॅप देण्यास सांगितलं. त्यानुसार त्यांनी रोडमॅप दिला आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू सारख्या राज्यात काँग्रेसला आघाडीसोबत उतरण्याचा सल्लाही प्रशांत किशोर यांनी दिला आहे. महाराष्ट्रात काँग्रेस ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत सत्तेत आहे. तर तामिळनाडूत डीएमकेसोबत आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची राष्ट्रवादीसोबत निवडणूक पूर्व आघाडी आहे. तर शिवसेनेसोबत निवडणुकीनंतरची आघाडी आहे. तामिळनाडूत डीएमकेसोबत निवडणुकीच्या आधीपासूनची काँग्रेसची आघाडी आहे.

डावे नको, तृणमूलसोबत जा

यावेळी प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला आणखी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांसोबत युती करू नका. त्याऐवजी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेससोबत युती करा. डाव्यांपेक्षा ममता बॅनर्जी यांचा पक्ष पश्चिम बंगालमध्ये मजबूत आहे, असा सल्ला पीके यांनी काँग्रेस हायकमांडला दिला आहे.

विरोधी पक्षांशी समन्वय ठेवा

यावेळी पीके यांनी काँग्रेसला आणखी एक सर्वात महत्त्वाचा सल्ला दिला आहे. तो म्हणजे विरोधी पक्षातील सर्व पक्षांशी चांगला समन्वय ठेवण्याचा. विरोधी पक्षांसोबत निवडणूक लढण्याची गरज नाही. पण निवडणुकीनंतर काँग्रेसने सर्व पर्याय खुले ठेवले पाहिजे. भाजपला पराभूत करायचं असेल तर विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे. या एकतेच्या केंद्रस्थानी काँग्रेसने राहावं. काँग्रेस स्वत:ला प्रबळ करून केंद्रातील सत्तेची दावेदारी करू शकते. त्यामुळे प्रबळ काँग्रेस सोबत प्रादेशिक पक्ष येऊ शकतात. प्रादेशिक पक्षांना आपल्यासोबत आणण्यासाठी काँग्रेसला येणाऱ्या सहा विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करावीच लागेल, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या:

Sanjay Raut Ayodhya Visit : ‘अयोध्या ही आमची पायवाट, तारीख लवकरच जाहीर करु’, संजय राऊतांचा दावा; मनसे, भाजपवर पलटवार

Narayan Rane | तीन पक्षांचं सरकार जूनमध्ये कोसळणार; वाशिममध्ये नारायण राणे यांनी वर्तविले भाकीत

Sharad Pawar on Raj Thackeray: कुणाला धोका असेल आणि सुरक्षा पुरवली जात असेल तर हरकत नाही: शरद पवार