थोडं सांभाळून बरं का, फासे पलटतील नी घोडे होतील फरार..अध्यक्षपदाचा निवडणुकीचा आला का काही अंदाज…

| Updated on: Sep 22, 2022 | 4:45 PM

काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्याबाबत काँग्रेसचा काय विचार आहे? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. आणि गांधी घराण्यातील एकही सदस्य अध्यक्षपदासाठी तयारही नसल्याचे दिसून येत आहे.

थोडं सांभाळून बरं का, फासे पलटतील नी घोडे होतील फरार..अध्यक्षपदाचा निवडणुकीचा आला का काही अंदाज...
Follow us on

नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्ष (Congress President) पदासाठीचे राजकारण प्रचंड तापले असले तरी, गेल्या अनेक दिवसांनंतरही राहुल गांधींनी पक्षाची कमान हाती घेण्या नकार दिला होता. म्हणून राहुल गांधींचे मन वळवण्याचाही प्रयत्न केला गेला. त्यातच अशोक गेहलोत राहुल गांधींची (Rahul Gandhi) भेट घेण्यासाठी कोचीला पोहोचले आहेत. मात्र राहुल गांधी अध्यक्षपदासाठी तयार नसल्याने या भेटीनंतर काय निर्णय घेतला जाईल याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. राहुल गांधींनी नकार दिल्यामुळे आता तब्बल 22 वर्षांनंतर काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक (Election 2022) होणार आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आता अधिसूचनाही जाहीर केली गेली आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीला 137 वर्षांचा दीर्घ इतिहास आहे. 1939 मध्ये सुभाषचंद्र बोस विरुद्ध पट्टाभी सीतारामय्या यांच्यामध्ये निवडणूक झाली होची.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार पक्षाचे ज्येष्ठ नेते शशी थरूर, अशोक गेहलोत, दिग्विजय सिंह हे अध्यक्षपदासाठी उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनीही निवडणुकीसाठी तयारीही केली आहे. तर सोनिया गांधींनी काँग्रेस अध्यक्ष पदासाठी जितके लोक निवडणूक लढवतील तितके पक्षासाठी फायद्याचे आहे असं म्हटले आहे. सोनिया गांधींनी निवडणूक मुक्त आणि निष्पक्ष होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्याबाबत काँग्रेसचा काय विचार आहे? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. आणि गांधी घराण्यातील एकही सदस्य अध्यक्षपदासाठी तयारही नसल्याचे दिसून येत आहे.

अशोक गेहलोत अध्यक्ष होण्याची शक्यता आहे का? या निवडणुकीतून काँग्रेसला काय संदेश द्यायचा आहे? आणि दुसरा महत्वाचा सवाल हा आहे की, काँग्रेस अध्यक्ष पद हे रबरी स्टॅम्पसारखेच ठेवायचे आहे का असे एक ना अनेक सवाल आता उपस्थित केले जात आहेत.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोतांनी अध्यक्ष पदाची पूर्ण तयारी केली आहे. तर या निवडणुकीत शशी थरूर यांचाही सहभाग असल्याचे दिसून येत आहे.

दक्षिण भारतातील तिरुअनंतपुरमचे खासदार असलेले शशी थरूर सुशिक्षित आणि अत्यंत बुद्धिमान नेता म्हणून समजले जाते. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

संसदेतही ते अतिशय अचूक युक्तिवाद करत असतात. गुणवत्तेत थरूर यांच्या पुढे कोणी नाही. पण शर्यतीत गेहलोत पुढे का? असाही सवाल काँग्रेसमधून केला जात आहे.

हिंदी हर्टलँड म्हणून समजल्या जाणाऱ्या पट्ट्यातून गेहलोत यांना जादूगार समजले जाते. ऑपरेशन लोटस आणि सचिन पायलट यांच्या विरोधानंतरही त्यांनी राजस्थानची सत्ता शाबूत ठेवली आहे.

त्यामुळे गेहलोतांना भाषिक समस्या तर बिलकूल नाही. राजस्थानला लागून असलेल्या हिंदी पट्ट्यातील राज्यांमधून गेहलोतांची जोरदार पकड आहे.

भाषेचीही अडचण नाही. दुसरीकडे, शशी थरूर यांच्या मागचा प्लस पॉइंट म्हणजे दक्षिण भारतात काँग्रेस मजबूत आहे आणि थरूर यांना अध्यक्ष केल्यास काँग्रेसकडून चांगला मेसेजही जाऊ शकतो. त्यामुळे अध्यक्ष पद दक्षिण भारतात ठेवायचे की उत्तर भारतात याचा विचार मात्र काँग्रेसला करावा लागणार आहे.

आता पक्षाध्यक्षपद हे गौण राहिलेले नाही. गांधी घराण्यापेक्षा मोठा चेहरा असलेल्या व्यक्तीकडे हे पद जावं असंही काँग्रेसला कधीच वाटत नाही. तर थरूर यांच्यासाठी अनेकवेळा पंतप्रधानपदाचीही मागणी केली आहे.