कोलकाता – सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagvat)च्या पश्चिम बंगाल दौऱ्याच्या (W. bangal tour)पार्श्वभूमीवर पोलिसांनी सतर्क राहावे, असे आदेश तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banrjee)यांनी दिले आहेत. राज्यात कोणत्याही परिस्थितीत दंगली होऊ नयेत, हे निश्चित करावे, असेही या आदेशात सर्व पोलीस अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे. १७ मे २० मे या काळात मोहन भागवत हे प. बंगालमधील कोशियारी या गावात राहणार आहेत. या काळात त्यांचा अजेंडा काय आहे, यावर प्रशासनाने नजर ठेवावी, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्यासुरक्षेची योग्य व्यवस्था करण्याचे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेण्यासही सांगण्यात आले आहे.
सरसंघचालकांना प्रशासनाने मिठाई आणि फळे पाठवावीत, जेणेकरुन अतिथींचं आदरातिथ्य प. बंगाल कसे करते, हे त्यांना कळेल, असेही ममता यांनी सांगितले आहे. मात्र अति करु नका, ते त्याचा फायदा उचलू शकतात, असेही ममता यांनी आदेशात सांगितले आहे.
ममता बॅनर्जी यांनी पोलिसांना दिलेल्या या आदेशांबद्दल, प. बंगालचे भाजपा अध्यक्ष दिलीप घोष यांनी टीका केली आहे. मोहन भागवत हे मान्यवर व्यक्ती आहेत, ते अनेक राज्यांचा दौरा करतात. त्यांच्या दौऱ्याबाबत एका मुख्यमंत्र्याने अशा प्रकारचे वक्तव्य करणे, हे ममतांना शोभा देत नाही, अशी टीका भाजपाने केली आहे.
प. बंगालात जेव्हा दंगली होत होत्या, तेव्हा मोहन भागवत इथे नव्हते, याची आठवणही त्यांनी करुन दिली आहे. तृणमूलचे कार्यकर्ते आणि पोलीस लोकांच्या सरेआम हत्या आणि बलात्कार करतायेत, पण सरकार त्यांना थोपवण्यासाठी कोणतीही कठोर पावले उचलत नसल्याची टीकाही घोष यांनी केली आहे.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी या वर्षी फेब्रुवारीत उत्तर बंगालच्या नक्षलवाडीत ४ दिवसांची बैठक केली होती. या बैठकीत संघाने प. बंगालमधील दार्जिलिंग, कलिम्पोंग हिल्स आणि शेजारील सिक्कीम भागातही संघाच्या शाखांच्या विस्ताराची योजना केली होती. सध्या राज्यात संघाच्या १८०० शाखा आहेत, त्यापैकी ४५० शाखा या उत्तरेकडच्या जिल्ह्यांत आहेत.