बापाच्या अंतिम संस्काराचा व्हिडीओ पाठवा, आमच्याकडे वेळ नाहीये… असं का म्हणाल्या तिन्ही मुली? वृद्धाश्रमाच्या संचालकाने सांगितली इन्साईड स्टोरी
आयुष्यभर मुलींना संभाळणाऱ्या वडिलांनी वृद्धाश्रमात 20 दिवस आजाराशी दिला लढा पण शेवटी झाले निधन. पण तिन्ही मुली अंत्यसंस्काराला आल्याच नाहीत. मुलीने 5100 रुपये पाठवले म्हणत अंत्यसंस्कार आणि अस्थी विसर्जनाची जबाबदारीही वृद्धाश्रमाकडे सोपवली.

हरियाणातील सोनीपत येथील एका वृद्धाश्रमात वास्तव्यास असलेले 74 वर्षीय शिवचरण रामरतन गुप्ता यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांबाबतची हळवी घटना समोर आली आहे. अंत्यसंस्काराला त्यांच्या तिन्ही मुली उपस्थित राहू शकल्या नाहीत. इतकेच नाही तर नंतर त्यांनी वडिलांच्या अस्थींचे गंगेत विसर्जन करण्याची जबाबदारीही वृद्धाश्रम प्रशासनावर सोपवली.
वृद्धाश्रमाचे संचालक आनंद यांनी सांगितले की, शिवचरण गुप्ता गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजारी होते. सुमारे 20 दिवसांपूर्वीच त्यांच्या तिन्ही मुलींना – नेपाळमध्ये राहणारी अनीता, उत्तर प्रदेशातील आझमगढ येथे राहणारी निशा आणि मुंबईतील प्रिया – वडिलांच्या प्रकृतीची माहिती देण्यात आली होती. मात्र, वैयक्तिक अडचणीचे कारण देत तिघींपैकी एकीही वडिलांना भेटण्यासाठी सोनीपतला आली नाही.
वडिलांच्या अंत्यसंस्काराला देखील आल्या नाहीत तिन्ही मुली
पत्नीच्या निधनानंतर शिवचरण गुप्ता यांचा मुलींशी फोनवर होणारा संवाद हाच त्यांचा मोठा आधार होता. मात्र प्रकृती खालावत गेल्यानंतर हा संवादही कमी होत गेला. अखेर पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
निधनानंतर वृद्धाश्रम प्रशासनाने तातडीने मुलींना माहिती दिली आणि त्या येणार असतील तर अंत्यसंस्कार थांबवण्याची तयारी दर्शवली. मात्र, तातडीने येणे शक्य नसल्याचे मुलींनी सांगितले. त्यामुळे वृद्धाश्रमाने व्हिडिओ कॉलद्वारे त्यांना वडिलांचे अखेरचे दर्शन घडवले. शेकडो किलोमीटर दूर बसून तिन्ही मुलींनी संपूर्ण अंत्यसंस्काराची प्रक्रिया पाहिली. हा प्रसंग उपस्थितांसाठीही अत्यंत भावनिक ठरला.
मोठी मुलगी अनीता हिने ऑनलाइन 5100 रुपये पाठवत वडिलांचे अंत्यसंस्कार विधीवत आणि सन्मानाने करण्याची विनंती केली. त्यानंतर मुलींनी संपूर्ण अंत्यसंस्काराचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही त्यांना पाठवण्याची विनंती केली.
वृद्धाश्रम प्रशासनाने पार पाडली सर्व जबाबदारी
सुरुवातीला मुलींनी वडिलांच्या अस्थी सुरक्षित ठेवण्यास सांगितले होते, कारण नंतर येऊन त्या स्वतः गंगेत विसर्जन करतील अशी त्यांची इच्छा होती. मात्र काही वेळाने पुन्हा फोन करून त्यांनी वेळेअभावी येणे शक्य नसल्याचे सांगत, अस्थी विसर्जनाची जबाबदारीही वृद्धाश्रमाकडे सोपवली. वृद्धाश्रम प्रशासनाने त्यांच्या इच्छेनुसार पुढील सर्व धार्मिक विधी करण्याची जबाबदारी स्वीकारली.
दरम्यान, शिवचरण गुप्ता यांनी हयातीत नेत्रदानाचा संकल्प केला होता. त्यांच्या निधनानंतर कुटुंबाच्या संमतीने त्यांचे नेत्रदान करण्यात आले असून, त्यामुळे दोन गरजू व्यक्तींना नवजीवनाची आशा मिळणार आहे.