Nirav Modi: देशातून पलायन केलेला हिरे व्यापारी नीरव मोदीवर ईडीची मोठी कारवाई, हाँगकाँगमधून 253 कोटींची संपत्ती केली जप्त

| Updated on: Jul 22, 2022 | 8:23 PM

पंजाब नॅशनल बँकेत 6498.20 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच्या चौकशीत हाँगकाँगमधील काही संपत्ती, हिरे, बँकेतील खात्यातील रक्कम ही नीरव मोदी याचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ही 253.62 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

Nirav Modi: देशातून पलायन केलेला हिरे व्यापारी नीरव मोदीवर ईडीची मोठी कारवाई, हाँगकाँगमधून 253 कोटींची संपत्ती केली जप्त
नीरव मोदीला ईडीचा झटका
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली – बँकांची फसवणूक करुन देशातून पळून गेलेला हिरे व्यापारी निरव मोदी (Nirav Modi)यांच्याविरोधात अंमलबजावणी सलंचलनालय म्हणजेच ईडीने मोठी कारवाई ( ED )केली आहे. ईडीने हाँगकाँगमधून (Hong Cong) नीरव मोदीची 253.62 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. या संपत्तीत हिरे, ज्वेलरी आणि बँकांमध्ये जमा असलेल्या रक्कमेचा समावेश आहे. आत्तापर्यंत नीरव मोदी याच्याविरोधात करण्यात आलेल्या अनेक कारवायांमध्ये २६५०.०७ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे, असा दावा ईडीने केला आहे. पंजाब नॅशनल बँकेसह अनेक वित्तीय संस्थांची फसवणूक करणारा निरव मोदी सध्या इंग्लंडमध्ये राहतो आहे. त्याचे भारतात प्रत्यार्पण व्हावे यासाठी सरकारच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे, मात्र त्यात अद्याप सरकारला यश मिळालेलं नाही.

ईडीने कशी केली कारवाई

सीबीआयने नीरव मोदीच्या विरोधात दाखल केलेल्या एफआयारच्या आधारावर ईडीने पैशांच्या अफरातफरी प्रकरणी नीरव मोदीविरोधात तक्रार दाखल करुन घेतली आहे. पंजाब नॅशनल बँकेत 6498.20 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच्या चौकशीत हाँगकाँगमधील काही संपत्ती, हिरे, बँकेतील खात्यातील रक्कम ही नीरव मोदी याचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ही 253.62 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

नीरव मोदीचे प्रत्यार्पण जटिल

जूनच्या शेवटच्या आठवड्यातही नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणासाठी आणखी एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आता इंग्लंडमध्ये ऑक्टोबरमध्ये सुनावणी होणार आहे. यावरुन नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाचे प्रकरण येत्या काळात अधिक जटिल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. नीरव मोदी याचे भारतात प्रत्यार्पण झाले तर तो आत्महत्या करु शकतो, असे नीरव मोदी याच्या वकिलाने कोर्टात सांगितले आहे. अशा स्थितीत त्याचे प्रत्यार्पण करणे चुकीचे ठरेल असा युक्तिवाद करण्यात आला आहे.

भारताच्या तुरुंगात राहण्याची नीरव मोदीची तयारी नाही

इतकेच नाही तर भारतातील तुरुंगांत खूप वाईट स्थिती आहे, असे नीरव मोदी याचे म्हणणे आहे. या सगळ्यात हाँगकाँगमध्ये कारवाई करत ईडीने नीरव मोदीच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. मद्य उद्योजक विजय माल्या, दिरे व्यापारी मेहुल चौक्सी आणि नीरव मोदी यांनी देशात फसवणूक करुन परदेशात पलायन केल्याप्रकरणी, केंद्र सरकारवर सातत्याने विरोधकांकडून टीका करण्यात येते.