महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याआधी मोठी बातमी, सुप्रीम कोर्टातील चार न्यायाधीशांना कोरोना

सुप्रीम कोर्टातील महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. सुप्रीम कोर्टात कोरोनाने थैमान घातल्याची माहिती समोर आलीय. सुप्रीम कोर्टातील तब्बल चार न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलीय.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याआधी मोठी बातमी, सुप्रीम कोर्टातील चार न्यायाधीशांना कोरोना
Reporter Sandeep Rajgolkar | Edited By: Chetan Patil | Updated on: Apr 22, 2023 | 11:57 PM

नवी दिल्ली : देशात कोरोनाचं (Corona) थैमान पुन्हा वाढू लागलं आहे. कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसतोय. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत कोरोनाचा प्रकोप वाढताना दिसतोय. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. त्यानंतर आज आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात महत्त्वाचं मानलं जाणाऱ्या सुप्रीम कोर्टात कोरोनाचा शिरकाव (Corona in Supreme Court) झालाय.

सुप्रीम कोर्टात पुन्हा कोरोनाची एन्ट्री झालीय. सुप्रीम कोर्टातील चार न्यायाधीशांना कोरोनाची लागण झालीय. सूत्रांकडून मिलालेल्या माहितीनुसार, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, एस रवींद्र भट, जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा या न्यायाधीशांना कोरोनाची लागण झालीय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुप्रीम कोर्टात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासन सतर्क झालंय. सुप्रीम कोर्टात वकील, पक्षकार, नागरिक यांना मास्क सक्ती करण्यात आलीय.

एका दिवसात 12 हजार पेक्षा जास्त रुग्ण

देशात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसतोय. विशेष म्हणजे गेल्या 24 तासात देशात तब्बल 12 हजार पेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच देशभरात एका दिवसांत तब्बल 42 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 12 हजार 193 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशात सध्या सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 67 हजार 556 इतकी झालीय. ही आकडेवारी शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंतची आहे.

देशात सध्या ओमायक्रोनच्या म्युटेट व्हर्जनने खळबळ उडवली आहे. तो प्रचंड वेगाने संक्रमित होताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा विषाणू 12 वर्षाच्या लहान मुलालादेखील बाधा पोहोचवू शकतो. त्यामुळे धाकधूक वाढली आहे. ओमायक्रोनचे देशभरात 400 म्युटेट व्हर्जन आहेत. पण त्यातील XXB हा सब-व्हेरिएंट जास्त रुग्णांमध्ये बघायला मिळतोय. हा व्हेरिएंट नेमका कितपत धोकादायक आहे, याबाबतची माहिती समजू शकलेली नाही. पण कोरोनाबाधितांचा वाढत असलेला नवा आकडा आणि कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची दररोजची आकडेवारी ही चिंता वाढवणारीच आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने काळजी घेणं जरुरीचं आहे. कारण बाधितांची वाढते आकडेवारी खरंच चिंताजनक आहे. त्यामुळे हे संकट आजही आपल्यासमोर पुन्हा आ वासून उभं राहण्याची भीती आहे. या संकटाला पुन्हा परतवण्यासाठी प्रत्येकत नागरिकांने मास्क वापरणं बंधनकारक आहे. याशिवाय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या सर्व सूचनांचे प्रत्येकाने पालन करणं आवश्यक आहे. आपण नियमांचं पालन केलं तरंच हे संकट आपण थोपवू शकतो.

Follow Us