
कौन बनेगा करोडपती हा भारतातील एक लोकप्रिय शो आहे. या शोमध्ये भाग घेणाऱ्या अनेकांचे नशीब पालटले आहे. मध्य प्रदेशमधील अमिता सिंह तोमर या तहसीलदार महिलेने या शोमध्ये भाग घेऊन 50 लाख रुपये जिंकले होते. मात्र आता आता अमिता यांना अटक करण्यात आली आहे. श्योपुर जिल्ह्यातील बडोदा तहसीलमध्ये 2021 साली उघड झालेल्या सुमारे अडीच कोटी रुपयांच्या पूर मदत घोटाळ्यात त्यांचे नाव आल्याने पोलिसांनी त्यांना ग्वालियरमधील त्यांच्या घरातून अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मध्य प्रदेशमधील विजयपूर येथील अमिता सिंह तोमर यांनी कौन बनेगा करोडपती या शोमध्ये 50 लाख रुपये जिंकले होते, त्यामुळे त्यांना देशभरात ओळख मिळाली होती. मात्र आता त्यांचे नाव पूर मदत घोटाळ्यात समोर आले आहे. यानंतरही त्या बराच काळ पदावर होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांची आगाऊ जामीन याचिका फेटाळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्यांना विजयपूर तहसीलच्या पदावरून हटवले होते. आता त्यांना अटक करण्यात आली आहे.
पूर मदत घोटाळा हा घोटाळा ऑडिट तपासणीदरम्यान समोर आला होता. तपासात असे समोर आले की अनेक बनावट आणि अपात्र लोकांच्या नावावर मदतीची रक्कम काढण्यात आली होती, ही रक्कम खऱ्या पीडितांना मदत देण्यात आलेली नाही. कागदपत्रांमध्ये फेरफार करून सरकारी तिजोरीची लूट करण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात फसवणूक, गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान SDOP स्तरावरील अधिकाऱ्यांनी 110 जणांना आरोपी बनवले आहे. यातील अनेकांना अटक करण्यात आली आहे.
श्योपुरचे SP सुधीर कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, या घोटाळ्यात अमिता सिंह तोमर यांचा सहभाग असल्याचे पुरेसे पुरावे मिळाले आहेत. सध्या तपास सुरू आहे, यातून आणकी काही लोकांची माहिती समोर येऊ शकते. दरम्यान, अटकेपूर्वी अमिता सिंह तोमर विजयपूरहून ग्वालियरला गेल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यामुळे त्या परदेशात पळून जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
अमिता सिंह तोमर यांना अटकेनंतर श्योपुर न्यायालयात हजर करण्यात आले, त्यावेळी त्यांना महिला कारागृहात पाठवण्यात आले आहे. तपासादरम्यान हेही समोर आले आहे की, 2021 मधील पुरानंतर मदत वाटपात मोठ्या प्रमाणावर अनियमितता करण्यात आली. 794 खऱ्या गरजूंना मदत देण्याऐवजी 127 बनावट लोकांना जवळपास 2.57 कोटी रुपये वाटण्यात आले. हे सर्व लोक आरोपींचे नातेवाईक होते.