PM Narendra Modi Speech : पंतप्रधान मोदींकडून 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत कोणते संकेत? मोदींच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे

| Updated on: Mar 10, 2022 | 9:06 PM

उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमधील मोठ्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजप कार्यालयातून भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर परिवारवादावरुन काँग्रेस आणि समाजवादी पार्टीसारख्या विरोधकांवर जोरदार टीका केलीय.

PM Narendra Modi Speech : पंतप्रधान मोदींकडून 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत कोणते संकेत? मोदींच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Image Credit source: TV9
Follow us on

नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) लिटमस टेस्ट म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागला. या निकालानं सत्ताधारी भाजपच्या विजयाचा वारू पुन्हा एकदा चौफेर उधळल्याचं स्पष्ट केलं. तर पंजाबमध्ये काँग्रेसला (Punjab Congress) जोरदार धक्का बसल्यानं विरोधकांना आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचं या निकालातून पुन्हा एकदा दिसून आलं. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमधील मोठ्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिल्लीतील भाजप कार्यालयातून भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर परिवारवादावरुन काँग्रेस आणि समाजवादी पार्टीसारख्या विरोधकांवर जोरदार टीका केलीय. अशावेळी पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे आपण पाहणार आहोत.

हा आनंदोत्सव भारताच्या लोकशाहीसाठी

हा उत्सव भारताच्या लोकशाहीसाठी आहे. या निवडणुकीत सहभाग घेणाऱ्या सर्व मतदारांना शुभेच्छा देतो. त्यांच्या निर्णयासाठी मतदारांचे आभार मानतो. विशेष रुपाने आमच्या माता भगिनींनी, युवकांनी ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीला समर्थन दिलं तो खूप मोठा संदेश आहे. निवडणुकीदरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी मला वचन दिलं होतं की यावेळी होळी 10 मार्चपासूनच सुरु होईल. आमच्या कर्मठ कार्यकर्त्यांनी हा विजय ध्वज उंचावून हे वचन पूर्ण केलंय. मी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. त्यांनी दिवसरात्र न पाहता मेहनत घेतली. जनतेचा विश्वास जिंकण्यात आमचे कार्यकर्ते यशस्वी ठरले. पक्षाचं नेतृत्व ज्यांनी केलं असा जे पी नड्डा यांचेही मी अभिनंदन करतो.

एनडीएसाठी विजयाचा चौकार

पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रमाने आज एनडीएसाठी विजयाचा चौकार लगावलाय. मित्रांनो उत्तर प्रदेशने देशाला अनेक पंतप्रधान दिले. मात्र, पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण करणारा एखादा मुख्यमंत्री पुन्हा निवडून येण्याची ही पहिली वेळ आहे. आता नड्डाजी यांनी सविस्तर सांगितलं की 37 वर्षानंत पहिल्यांदाच तिथे एखादं सरकार पुन्हा निवडून आलंय. यूपी, गोवा आणि मणिपूरमध्ये सरकार असूनही भाजपच्या वोट शेअरमध्ये वाढ झालीय. गोव्यात सर्व पोल फोल ठरले. तिथल्या जनतेनं तिसऱ्यांना सेवा करण्याची संधी दिलीय. 10 वर्षे सत्तेत राहूनही राज्यात भाजपच्या जागांची संख्या वाढलीय. उत्तराखंडमध्येही भाजपनं नवा इतिहास रचलाय. राज्यात पहिल्यांदाच एखादी पार्टी सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलीय. सीमेवरील एक पहाडी राज्य, एक समुद्रकिनाऱ्यावरील राज्य आणि एक गंगा नदीशी जोडलेलं राज्य, म्हणजे भाजपला चहूबाजूंनी आशीर्वाद मिळालाय.

गरीब, सामान्यांसाठी काम हेच भाजपच्या विजयाचं गुपित

भाजपची निती, भाजपाची नियत आणि भाजपच्या निर्णयावर अपार विश्वास. हे निवडणूक निकाल भाजपच्या प्रो पुअर, प्रो अॅक्टिव्ह गव्हर्नन्सवर मोहोर उमटवतात. आधी जनता आपल्या हक्कांसाठी सरकारचा दरवाजा ठोठावत राहायची. सामान्य गरजांसाठी सरकारी कार्यालयांच्या चकरा माराव्या लागायच्या, पैसा द्यावा लागायच्या. देशात गरीबांच्या नावानं अनेक घोषणा झाल्या, योजना बनल्या पण ज्या गरीबाचा त्यावर हक्क आहे, त्याला तो विना त्रास मिळवण्यासाठी चांगले प्रशासन, डिलीव्हरीचं महत्व असतं. भाजप ही बाब जाणते. मी बराच काळ मुख्यमंत्री राहिल्यामुळे शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे मला माहिती आहे.

भाजप गरिबांना भरोसा देते की प्रत्येक गरिबापर्यंत सरकारनं निर्णय घेतलेल्या सुविधा नक्की पोहोचतील. मी गरिबांच्या घरात त्याचा हक्क पोहोचल्याशिवाय स्वस्थ बसणारा माणूस नाही. दोन दशकांपेक्षा जास्त काळापासून जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली. त्यासाठी किती अडचणी असतात हे मी जाणतो. तरीही मी हिम्मत केली. ती हिम्मत मी लाल किल्ल्यावरुन माझ्या भाषणात व्यक्त केली. मी म्हणालो होतो भाजपला जिथे जिथे सेवा करण्याची संधी मिळेल तिथे काम शंभर टक्के पूर्ण करू, प्रत्येक योजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवू.

आम्ही प्रत्येक गरिबापर्यंत पोहोचू. प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचू. मी आज माता-भगिनींना विशेष रुपानं नमन करतो. निवडणूक प्रक्रियेत त्याचं मोठं योगदान आहे. आमचं सौभाग्य आहे की माता-भगिनींनी भाजपला मोठ्या प्रमाणात मतदान केलं. जिथे माता-भगिनींनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं तिथे भाजपचा विजय झाला. देशातील माता-भगिनी भाजपवर विश्वास ठेवत आहेत. त्यांना माहिती आहे की त्यांची छोटी-छोटी गरज भाजप पूर्ण करु शकतो.

जातीवादावरुन विरोधकांवर हल्लाबोल

काही ज्ञानी लोक यूपीतील जनतेला फक्त जातीवादाच्या तराजूत तोलत होते. ते उत्तर प्रदेशातील जनतेला जातीवादात अडकवून ठेवत त्या जातीचा, उत्तर प्रदेशचा अपमान करत होते. काही लोक यूपीला बदनाम करतात की इथली निवडणूक केवळ जातीवर आधारीत असते. पण मी सांगतो की मागील आणि आताची निवडणूक बघा… प्रत्येक वेळी यूपीच्या जनतेनं विकासवादाची निवड केलीय. यूपीतील जनतेनं त्या ज्ञानी लोकांना ही शिकवण दिलीय. यूपीच्या प्रत्येक मतदाराने शिकवण दिलीय की जातीचा मान देशाला जोडण्यासाठी असावा, ना की देश तोडण्यासाठी आणि हे त्यांनी करुन दाखवलं आहे.

2022 च्या निकालाने 2024 चा निकाल स्पष्ट

आज मी हे देखील सांगेन की 2019 च्या निवडणुकीनंतर काही ज्ञानी लोकांनी सांगितलं होतं की, 2019 च्या विजयात काय आहे ती तर 2017 मध्येच तयार झाली होती. मी मानतो की ते ज्ञानी आता 2022 च्या निकालाने 2024 चा निकाल स्पष्ट केल्याचं म्हणतील.

पंजाबमधील भाजप कार्यकर्त्यांचंही कौतुक

मी आज पंजाबच्या भाजप कार्यकर्त्यांची विशेष प्रशंसा करेल. त्यांनि विपरीत परिस्थितीत पक्षाचा झेंडा बुलंद केलाय. ते येणाऱ्या काळात पंजाबमध्ये भाजपच्या मजबुतीला एक प्रमुख स्थान देतील. पंजाबमध्ये भाजप एक शक्तीच्या रुपाने समोर येईल याचा मला विश्वास आहे. येणाऱ्या 5 वर्षात भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांचं दायित्व निभावेल. हा विश्वास मी पंजाबच्या जनतेला देतो.

भाजपची निती जमिनीशी जोडलेली

ही निवडणूक अशावेळी झाली जेव्हा जग कोरोना सारख्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. 100 वर्षात अशी महामारी आली नसेल. हे कमी होतं म्हणून की काय युद्धाने जगाची चिंता वाढवली आहे. अशास्थितीत जगभरातील पुरवठा साखळी कोसळली आहे. या कठीण प्रसंगाचा सामना करण्यासाठी भारताने उचललेलं पाऊल भारताला आतापर्यंत पुढे जाण्यास मोठी मदत केलीय. भाजप वाचू शकला कारण आपली निती जमिनीशी जोडलेली राहिली. जिथे जिथे डबल इंजिनचं सरकार राहिलं तिथे जनतेच्या हिताचे निर्णय झाले. मोठं विकास कार्य झालं.

अर्थसंकल्पावर नजर टाकली तर एक विश्वास निर्माण होतो

सध्या सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम जगभरातील सर्व देशांवर होतोय. भारत शांततेचा पुरस्कार करतोय. जे देश निवडणूक लढत आहेत. त्या देशांशी भारताचं अनेक क्षेत्राशी संबंधाने नातं आहे. कच्च्या तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात वाढतेय. युद्धामुळे संपूर्ण जगात महागाई वाढतेय. विकसनशील देशांना विशेषरुपानं कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतोय. अशावेळी आपल्या अर्थसंकल्पावर नजर टाकली तर एक विश्वास निर्माण होतो. मी मानतो की जगभरातील या विपरीत वातावरणात भारताच्या जनतेनं, विशेष करुन उत्तर प्रदेशसारख्या राज्यानं आपल्या दूरदृष्टीचा परिचय दिलाय.

काँग्रेस, विरोधकांवर हल्लाबोल

भारताच्या मतदारांनी या निवडणुकांमध्ये स्थिर सरकारसाठी मतं दिली. ते लोकशाही भारतीयांच्या रक्तात असल्याचं प्रतिबिंब आहे. आज या ठिकाणी मी देशासमोर काही चिंता मांडतोय. देशाचा नागरिक मोठ्या जबाबदारीनं देशहितासाठी आपलं काम करतोय. जेव्हा त्याला संधी मिळते तेव्हा तो जबाबदारीनं पुढे येतो. मात्र, आपल्याकडे काही लोक सातत्याने राजकारणाचा स्तर घसरवताना दिसतात.

‘ऑपरेशन गंगा’ला प्रदेशाच्या वादात अडकवण्याचा प्रयत्न झाला

कोरोना काळात आम्ही पाहिलं की या लोकांनी देशवासियांना संभ्रमित करण्याचे प्रयत्न केले. लसीकरणाच्या आमच्या प्रयत्नांचं स्तुती संपूर्ण जग करतेय. अशावेळी भारताच्या लसीवर प्रश्न उपस्थित केले गेले. यूक्रेनमध्ये आपले विद्यार्थी अडकून पडले होते त्यावेळी काही लोक त्यांच्या मनात असुरक्षेची भावना, कुटुंबियांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम केलं. काहींनी ऑपरेशन गंगाला प्रदेशाच्या वादात अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हे प्रयत्न भारताच्या भविष्यासाठी चिंताजनक आहेत.

परिवारवादावर हल्लाबोल

ज्या एका गोष्टीवर मी सर्वाधिक चिंता व्यक्त केली होती, ती म्हणजे परिवारवाद. मी कोणत्याही परिवाराच्या विरोधात नाही. पण मी लोकशाहीची काळजी करतो. मी लोकांना सांगितलं की अशा परिवारवादाच्या राजकारणाने त्यांच्या राज्याचं किती नुकसान केलं. मला आनंद आहे की मतदारांनी माझे विचार लक्षात घेतले आणि लोकशाही बळकट करण्याचं काम केलं. जे मुद्दे मी मांडतोय त्यावर निरपेक्षपणे चर्चा होणं गरजेचं आहे. परिवारवादी राजकारणाचा सूर्यास्त देशाचे नागरिक करतील असा एक दिवस नक्की येईल. या निवडणुकीत देशाच्या मतदारांनी काय होणार आहे याचा इशारा दिला आहे.

भ्रष्टाराचाराच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीवर निशाणा?

आज अजून एक विषय मी लोकांसमोर ठेवतोय. भ्रष्टाराचाविरोधात कारवाई व्हावी की नाही? पण काहीजण अशा कारवाया रोखण्याचं काम करत आहेत. लोकांच्या मनात अशा भ्रष्टाचाऱ्यांबाबत एक प्रकारचा राग आहे. भाजप 2014 मध्ये एक इमानदार सरकारचं आश्वासन देत निवडणूक लढवली. 2019 ला पुन्हा आम्हाला जनतेनं सत्तेत बसवलं. देशाला आमच्याकडून अपेक्षा आहे की आम्ही भ्रष्टाचार संपवावा. पण आज आम्ही पाहतो की ज्या निष्पक्ष संस्था आहेत, ज्या भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करतात, तर हे लोक त्या संस्थांना बदनाम करण्याचं काम करत आहेत. हे देशाचं मोठं दुर्भाग्य आहे की घोटाळ्यात बरबटलेले लोक आता या संस्थांवर दबाव बनवत आहेत. हे लोक या संस्थांना रोखण्यासाठी नवे नवे पर्यात शोधत आहेत. त्यांना न्यायपालिकेवरही विश्वास नाही.

हे लोक कोणत्याही भ्रष्टाराऱ्यांवर कारवाई होताना त्याला धर्म, जातीचा रंग देतात. एखाद्या माफियाविरोधात न्यायालय निर्णय देतं तेव्हा त्यालाही जात, धर्माशी जोडलं जातं. मी सर्व संप्रदायातील लोकांना अपील करतो की अशा लोकांना आपल्या समाजापासून दूर करण्याची हिम्मत करा. यामुळे समाजाचं भलं होईल.

इतर बातम्या :

भाजपला बंपर विजय कसा मिळाला? नरेंद्र मोदींनी सिक्रेट जगजाहीर केलं, विरोधक लक्ष देतील?

Uttar Pradesh Election Result 2022 : ‘उत्तर प्रदेशातील प्रचंड विजयाचं श्रेय पंतप्रधान मोदी, कार्यकर्ते आणि जनतेला’, योगी आदित्यनाथांची पहिली प्रतिक्रिया