
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात तब्बल २७ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. पहलगाममधील अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन खोऱ्याच्या वरच्या बाजूला टेकड्यांवर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर आता मृत्यू झालेल्या आणि जखमी झालेल्या पर्यटकांची नावे समोर आली आहेत.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या मृतांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, गुजरातसह दोन परदेशातील नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आता यातील १६ मृतांची नावे समोर आली आहेत. तसेच यात १० जण जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हल्ल्यात महाराष्ट्रातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन परदेशी नागरिकांचा या गोळीबारात मृत्यू झाला आहे.
दरम्यान जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी परिसरातील श्रीराम अचल इमारतीत राहणारे अतुल मोने यांचा मृत्यू झाला. ते परेल रेल्वे वर्कशॉपमध्ये सेक्शन इंजिनियर म्हणून काम करत होते. अतुल मोने हे त्यांची पत्नी, मुलगी यांच्यासह नातेवाईकांची तीन कुटुंब काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते. या दुर्घटनेनंतर मोने यांचे नातेवाईक तातडीने काश्मीरकडे रवाना झाले आहेत.
तसेच या हल्ल्याच्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि यावल तालुक्यातील १६ महिलांचा ग्रुप पर्यटनासाठी गेला होता. सुदैवाने या सर्व महिला सुरक्षित आहे. स्थानिक आमदार अमोल जावळे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सीआरपीएफ जवानांनी या महिलांना सुरक्षित स्थळी हलवले असून त्या उद्या जळगावकडे परतणार आहेत.