अभिनंदन यांना पकडणाऱ्या पाक कमांडोचा खात्मा
भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Indian Wing Commander Abhinandan) यांना पकडणाऱ्या पाकिस्तानी कमांडो अहमद खान (Ahmad Khan) याला भारतीय सैनिकांना ठार केले आहे.
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Indian Wing Commander Abhinandan) यांना पकडणाऱ्या पाकिस्तानी कमांडो अहमद खान (Ahmad Khan) याला भारतीय सैनिकांनी ठार केले आहे. अहमद खान हा नियंत्रण रेषेवरुन काही दहशतवाद्यांसह भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र भारतीय सैनिकांनी त्याचा हा प्रयत्न हाणून पाडत त्याला ठार केले आहे.
अहमद खानने यापूर्वीही नौशेरा, सुंदरवनी, पल्लनवाला आणि इतर आजूबाजूच्या सेक्टर्समधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या काही दिवसांपासून त्याला पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर तैनात करण्यात आले होते. भारतीय क्षेत्रात दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास मदत व्हावी म्हणून त्याला या ठिकाणी ठेवण्यात आले होते. मात्र भारतीय जवानांच्या सतर्कतेमुळे पाकिस्तानचा हा डाव हाणून पाडला.
दरम्यान नुकतंच भारत आणि पाकिस्तानमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान पाकिस्तानने पूंछमधील कृष्णा घाटीमधून बॉम्ब फेकले. याच वेळेस पाकिस्तानचे काही दहशतवादी नियंत्रण रेषेवरुन भारतात घुसण्याच्या प्रयत्नात होते. यावेळी भारतीय जवानांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. याच दरम्यान पाकिस्तानी कमांडो अहमद खान याला ठार करण्यात आले.
Pakistan Army SSG Subedar Ahmad Khan, currently a deputy company commander of SSG, killed in a clash with Indian army along LoC in Nakyal sector today morning. He was a veteran of five operations in NW Pak and was also in SSG Zarrar company. pic.twitter.com/si4TuEsBUH
— Wolfpack? (@airassault71) August 17, 2019
जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारी 2019 रोजी सीआरपीएफच्या ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. यात 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 13 दिवसांनंतर भारतीय हवाई दलानं पाकिस्तानविरोधात एअरस्ट्राईक केला आणि बालाकोट परिसरातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली होती.
या एअरस्ट्राईक कारवाईनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतीय हद्दीत एफ-16 लढाऊ विमानांची घुसखोरी केली होती. यावेळेस हवाईदलाच्या मिग-21 बायसन विमानानं पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडलं. पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमानाचा पाठलाग करतानाच अभिनंदन वर्धमान यांचं मिग-21 विमान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत शिरलं. विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर अभिनंदन यांनी पॅरशूटच्या मदतीने खाली उडी मारली. पण चुकून ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोहोचले. यानंतर अभिनंदन यांना पाक सैन्यानं आपल्या ताब्यात घेतलं. मात्र त्यानंतर 1 मार्चला पाकिस्तानने अभिनंदन यांची मुक्तता केली होती.
यानंतर अभिनंदन यांनी लगेचच भारतीय हवाईदलात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. तसेच येत्या काही दिवसात ते लढाऊ विमानही चालवण्यास सज्ज होतील अशी माहिती सूत्रांनी दिली होती. त्यांच्या या पराक्रमानंतर त्यांना स्वातंत्र्य दिनी वीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते.