मान्सूनपूर्व पावसाचा देशात हाहा:कार, या तीन राज्यांत 57 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रालाही फटका, पुढचे तीन दिवस पाऊस बरसणार

वादळाने आणि अतिवृष्टीने बिहार, आसाम आणि कर्नाटक राज्याला चांगलेच झोडपून काढलेले आहे. महापुरामुळे आणि वीज पडल्याने आत्त्यापर्यंत या तीन राज्यांत ५७ जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाऊस बरसत असून, दुष्काळी भागात पूरस्थिती निर्माण झालेली आहे.

मान्सूनपूर्व पावसाचा देशात हाहा:कार, या तीन राज्यांत 57 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रालाही फटका, पुढचे तीन दिवस पाऊस बरसणार
flood in 3 states.jpg
Image Credit source: social media
| Edited By: Sandip Sakhare | Updated on: May 21, 2022 | 5:00 PM

मुंबई मान्सून येण्यापूर्वीच देशात मान्सूनपूर्व पावसाने हाहाकार उडाला आहे, त्यामुळे यंदा मान्सूनमध्ये काय स्थिती होईल, याची चिंता सगळ्यांना लागली आहे. वादळाने आणि अतिवृष्टीने बिहार, आसाम आणि कर्नाटक राज्याला चांगलेच झोडपून काढलेले आहे. महापुरामुळे आणि वीज पडल्याने आत्त्यापर्यंत या तीन राज्यांत ५७ जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाऊस बरसत असून, दुष्काळी भागात पूरस्थिती निर्माण झालेली आहे. २१ मे ते २४ मे या काळातही आणखी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. २३ तारखेला मोठा पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

आसाममधील परिस्थिती बीकट

मान्सूनपूर्व पावसाचा सर्वाधिक फटका आसामला बसला आहे. या ठिकाणी ब्रह्मपुत्रा आणि त्याच्या सोबत राहणाऱ्या नद्यांमध्ये महापुरामुळे हाहाकारा उडालेला आहे. अनेक गावांना जलसमाधी मिळाली आहे. सुमारे ७ लाख नागरिकांचे जनजीवन हे पुरामुळे विस्कळीत झाले आहे. सगळी पिके हातची गेली आहेत. आसाममध्ये ५०० पेक्षा जास्त नागरिक सध्या रेल्वे रुळांवर राहत आहेत. आसाममध्ये पूरस्थितीमुळे १५ जणांचा बळी गेला आहे. सरक्वात जास्त मृत्यू हे बिहारमध्ये झाले आहेत. तिथे ३३ जणांचा बळी हा अंगावर वीज पडल्याने झाला आहे. तर कर्नाटकात ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. खराब हवामानामुळे दिल्लीतील १० फ्लाईट्स या अमृतसर विमानतळावर उतरवण्यात आल्या आहेत.

आसाममध्ये २९ जिल्ह्यांत ७.१२ लाख लोक बेघर

आसाम सरकारच्या माहितीनुसार राज्यात २९ जिल्ह्यांतील ७.१२ लाख नागरिक या पावसामुळे बेघर झाले आहेत. एकट्या नागाव जिल्ह्यांत ३.३६ लाख नागरिक प्रभावित झाले आहेत. कछार जिल्ह्यांतील १.६६ लाख, होजई जिल्ह्यातील १.११ लाख नागरिक आणि दरांग जिल्ह्यांतील ५२ हजार नागरिकांचा यात समावेश आहे.

बिहार १६ जिल्ह्यांत ३३ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये शुक्रवारी वादळ आणि वीज पडल्याने १६ जिल्ह्यांत किमान ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ४ लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे. शनिवारी आणि रविवारीही बिहारमध्ये वादळ आणि पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कर्नाटकात ९ जणांचा मृत्यू, शाळाकॉलेजेस बंद

कर्नाटकातही मान्सूनपूर्व पावसाने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नऊ जणांचा मृत्यू तर काही जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येते आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा आणि कॉलेजेस बंद करण्यात आली आहेत. एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. मान्सूनपूर्व पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात आणखी दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसाने पिकांचेही मोठे नुकसान केले आहे.

महाराष्ट्रालाही फटका

मान्सूनपूर्व पावसाने राज्यालाही फटका बसलाय. सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी यासह मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला आहे. यात अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. सांगलीत दुष्काळग्रस्त भागात पडलेल्या पावसाने पूल पाण्याखाली गेले आहेत. मान्सूनपूर्व पाऊस एवढआ मोठा असेल तर मान्सूनचा किती असेल, याची भीती सध्या सांगली, कोल्हापुरातील जनतेला वाटते आहे.

Follow Us